दैनिक चालु आहे प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आणि कन्या शाळा भोवतालची ३६ अतिक्रमणे बुधवारी जेसीबी यंत्राने हटवण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होणाऱ्या या कारवाई पूर्वी अतिक्रमणधारकांना दोन दिवस अगोदर तोंडी सूचना दिल्या होत्या.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी जी.एस पेटे, कार्यालयीन अधीक्षक सुधाकर खैरे, पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे, पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत, आस्मान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पोलिस फौजफाटा आणि नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. त्यामुळे अनेक वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या कन्या शाळेने मोकळा श्वास घेतला आहे. मंठा शहरात अनेक भागात अतिक्रमण वाढल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. मुख्य
रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याचाच भाग झाला आहे. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर शहराचे सौंदर्य वाढेल अशी अपेक्षा होती परंतू, अतिक्रमणामुळे
आणि बेशिस्त वाहनधारक तसेच हातगाडेधारक यांच्यामुळे वारंवार
वाहतुकीची कोंडी निर्माण होत
आहे. आठवडी बाजारच्या दिवशी तर वाहतुकीची कोंडी ही सततचीच डोखे दुखी झाली आहे. अशा परिस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील काही अतिक्रमणे हटवल्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. अनेकदा व्यापारी दुकानाच्या समोर रस्त्यावर माल लावतात यामुळे देखील रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असुन याबाबतही नगरपंचायत कडून कारवाई होणे गरजेचे आहे.
🎆न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
मंठा शहरातील अतिक्रमण हटावण्याची कारवाई सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे करण्यात येत असल्याची माहिती नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी जी. एस. पेंटे यांनी दिली.