दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
मराठवाड्यात खरीप पीक कर्ज वाटपामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे. खरीप हंगामामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याचं भुमरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते.
दरम्यान, यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत आहे. सिंचनाचे प्रमाण वाढावं म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाय योजना करत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्यासाठी जिल्ह्यातील 119 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
भुमरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे…
खरीप पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर
खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांना 1 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 40 हजार लाभार्थ्यांना 994 कोटीरकमेचा कर्ज मुक्तीचा लाभ
प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत 26 हजार शेतकरी लाभार्थ्यांना 80 कोटी इतक्या रकमेच्या कर्जमुक्तीचा लाभ
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा सुरुवातीपासून राज्यामध्ये प्रथमस्थानी
प्रकल्पामधून 1 लाख 13 हजार शेतकऱ्यांना 734 कोटी रुपयांचे अनुदान वाटप
खरीप हंगामामध्ये 1 लाख 91 हजार सभासदांना 1 हजार 330 कोटी तर रब्बी हंगामामध्ये 64 हजार सभासदांना 623 कोटी रुपयांचे कर्ज वाटप
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 175 प्रस्तावांना मंजूरी
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपला जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर-927 उद्योजकांना कर्जाचे वाटप
75 वर्षांवरील 36 लाख एवढ्या नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला
महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत- 14 लाख 30 हजार महिलांनी घेतला लाभ
दिवाळीनंतर गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात अंदाजे 10 लाख 60 हजार किटचे वाटप
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना मिळून 1 लाख 20 हजार मेट्रीक टन मोफत धान्य वितरीत
सरासरी दरमहा 22 लाख 40 हजार लाभार्थ्यांना मोफत धान्याचा लाभ
शिवभोजन-एकूण 61 शिव भोजन केंद्रांमधून दैनदिन 7 हजार शिव भोजन थाळी वाटप
आज पर्यंत 50 लाख गरजूंनी घेतला योजनेचा लाभ
जिल्ह्यातील 25 तृतीय पंथीयांना रेशन कार्ड आणि 47 तृतीय पंथीयांना ओळखपत्राचे वाटप
गोपिनाथराव मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत 1 हजार 500 कामगारांना ओळखपत्र