दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनीधी -वसंत खडसे
उपसंपादक दै. चालु वार्ता
वाशिम : जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून सुरू झालेले अवकाळी पावसाचे थैमान मे महिन्याचा पहिला हप्ता संपत आला तरी सुरूच आहे. सलग पंधरा दिवसाचा अवधी उलटूनही अवकाळी पावसाची अवकळा आपला मुक्काम हलविण्यास तयार नसल्याने, दिवसाआड रोज अवकाळी पावसाची हजेरी सुरूच आहे. परिणामी वाळत टाकलेल्या हळद पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, इतर बागायती पिकांसह उडीद, मूग, भुईमूग आदी उन्हाळी पिकांचे सुद्धा अतोनात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तथापि जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असून या गंभीर संकटाची शासनाकडून दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात काढणीला सुरुवात झालेल्या हळद पिकाची एप्रिलच्या दुसऱ्या हप्त्यापर्यंत जवळपास संपूर्णतः काढणी झालेली असते. त्यानंतरचा दुसरा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे हळद उकडून ती वाळत घालण्याचा. बहुतांश शेतकऱ्यांचा हा टप्पा पूर्ण झाला असून, मोठ्या प्रमाणात हळद पीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पसर पडलेली आहे. परंतु दिवसाआड बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे सदर हळद दररोज जमा करून, झाकणे व परत पाऊस थांबला की, हळद वाळविण्यासाठी पसरवून देणे. यामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असता, काल परवा झालेल्या अवकाळी दमदार पावसाने सर्वत्र पाण्याचे लोट वाहले आहेत. त्यामुळे झाकलेली हळद सुद्धा पाण्याखाली येऊन संपूर्ण भिजली आहे. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांची हळद कुजून बुरशी धरत आहे. बागायती पिकात मोडत असलेले हळदीचे पीक हातात येण्यास संपूर्ण वर्ष लागत असले, तरी हमी व नगद पीक असल्याने दोन पैसे शिल्लक चे पदरात पडतील या आशेने शेतकरी हळदीच्या पिकास पसंती देतात. तथापि यावर्षी वाशिम जिल्ह्यात हळद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. आणि जवळपास पीक हातात आले असून, फक्त घरात नेणे बाकी आहे. अशातच अवकाळी पावसाची ” अवकळा ” प्रगटल्याने तोंडी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावून गेले आहेत. या गंभीर संकटाचा स्थानिक आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या विविध संघटनांनी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन शासन दरबारी शेतकऱ्यांची व्यथा मांडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
” मी दोन एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड केली होती. पिकाचा कालावधी पूर्ण झाल्याने काढणी करून उकडून वाळवत ठेवण्यासाठी शेतात पसरवून ठेवली आहे. वातावरणाचा रोख पाहून दररोज झाकण्याची व उघडण्याची पुरेपूर काळजी घेतली, परंतु काल-परवा झालेल्या दमदार अवकाळी पावसामुळे, शेतात पाण्याचे लोट वाहून माझी झाकलेली हळद संपूर्ण भिजली आहे. त्यामुळे हळद काळी पडली असून, तिच्यावर बुरशी चढली आहे. त्यामुळे पुढील भवितव्याबाबत काळजी वाटते.
.
विठ्ठल पंजाबराव खडसे
( शेतकरी )