दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – ज्ञानेश्वर साळुंके.
जालना जिल्ह्यामध्ये पती-पत्नीच्या घरगुती कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये पतीने पत्नीचा रागाच्या भरामध्ये खून केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यांतील शहागड येथील पैठण रोडवरील वीटभट्टी या ठिकाणी घटना घडली आहे. वीटभट्टी कामगार ज्योती दिलीप भास्कर(वय ३०) रा.धनगर वस्ती श्रीरामपूर असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती दिलीप रंगनाथराव भास्कर सदर संशयित आरोपी खून केल्यानंतर फरार झाला आहे. या घटनेची माहिती गोंदी पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अंबड तालुक्यांतील शहागड येथील वीटभट्टी व्यवसाय अफसर शेख यांच्याकडे वीटभट्टीच्या कामासाठी मजूर म्हणून पती-पत्नी काम करायचे श्रीरामपूर मधील वीटभट्टी मजूर दिलीप भास्कर व पत्नी ज्योती भास्कर गेले वर्षभरांपासून काम करीत आहेत. मात्र दिनांक ५ मे रोजी सायंकाळच्या सुमारांस पती-पत्नीच्या घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात त्यांचा हा वाद अखेर चांगलाच विकोपाला गेला होता. पती दिलीप भास्कर यांने रागाच्या भरात पत्नी ज्योती भास्कर हिचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. या प्रकरणानंतर पती दिलीप भास्कर यांनी तिथून धूम ठोकली. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर घटनेचा पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील तीर्थपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके, गोपनीय शाखेचे महेश ताटे व पोलीस कर्मचाऱ्यांना घेवुन सदर घटनेची माहिती घेवुन पंचनामा केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून गोंदी पोलीस फरार झालेल्या संशयित पती आरोपीचा शोध घेत आहे.