दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: नवीन बस स्थानकातून अचानक बाहेर पडणाऱ्या
कारला चकविण्याचा प्रयत्नात देगलूर आगाराची बस दुभाजकावर चढली. बसचे समोरील उजवीकडचे टायर फुटले, रेडिएटर, चेसीसचे नुकसान झाले. ऑटोला धडक बसली. परंत बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. ही घटना ४ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास देगलूरच्या नवीन बसस्थानकासमोर घडली. असा भोंगळा कारभार देगलूर आगारामध्ये बघायला भेटत आहे.
देगलूर आगाराची दोन थांबा बस क्र. एम. एच. २० बी. एल. ३५५८ नांदेडहून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास देगलूरकडे निघाली. सदर बस देगलूरच्या नवीन बस स्थानकासमोर दुपारी ४.२५ च्या सुमारास आली. देगलूर आगारातील बहुसंख्य गाड्या जुन्या झाल्या असून त्या खिळखिळ्या झाल्या आहेत. भंगारावस्थेकडे झुकलेल्या गाड्यांपैकी बऱ्याच गाड्या प्रवासादरम्यान बंद पडत आहेत. बसगाड्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढी यंत्रसामग्री देगलूर आगारात उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. यंत्रसामग्री उपलब्ध असेल तर यांत्रिकी कामगार जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून कामात टाळाटाळ करतात. त्यामुळे उपलब्ध असलेल्या गाड्या देखील वेळेवर प्रवासासाठी निघू शकत नाहीत. देगलूर आगारासाठी सव्वाशेच्यावर तिकीट मशीन आल्या होत्या; परंतु आजघडीला त्यातील बहुसंख्य तिकीट मशीन बंद आहेत. काहींना चार्जिंग होत नाही, काहींना रोल मिळत नाहीत, काहींचा डिस्प्ले गेलेला आहे. यामुळे देखील वाहकांना वेळेवर गाडी आगारातून बाहेर काढता येत नाही…सध्या सुरु असलेली लगीनघाई तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात देण्यात आलेल्या सवलतीमुळे एसटी बसची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या प्रवासी संख्येला प्रवासाची योग्य व वेळेवर सुविधा देण्यात देगलूर आगार असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्ण प्रवास भाडे भरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बेहाल होत आहेत.
सध्या सर्वत्र लगीनघाई, वास्तुशांती, उपनयन संस्कार, नामकरण सोहळे, कंदोऱ्या, जावळं, हरिनाम सप्ताह आदी अनेक सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी असंख्य प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत खूप मोठी भर पडली आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्य सरकारच्या आदेशानुसार १६ ऑगस्ट २०२२ पासून संपूर्ण राज्यातील (७७ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठनागरिकांसाठी महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात १०० टक्के अर्थात मोफत प्रवास सवलत सुरु केली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचे प्रमाण खूप वाढले आहे. महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने १७ मार्च पासून राज्यातील सर्व महिलांना बसगाड्यांमध्ये ५० टक्के प्रवास भाड्यावर प्रवास करण्याची सवलत ‘दिली आहे. त्यामुळे एकेकाळी विना प्रवासी किंवा अत्यल्प प्रवासी घेऊन जाणारी लालपरी आता प्रवाशांनी खचाखच भरलेली दिसन येत आहे.बसगाड्यांना भरपूर गर्दी वाढल्यामुळे सवलतीच्या दरात प्रवास करणारे अनेक पुरुष, महिला सीटवर बसून प्रवास करीत आहेत. तर पूर्ण प्रवास भाडे देणारे प्रवासी बहुसंख्य वेळा उभे राहून प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. देगलूर तालुक्याची व्याप्ती खूप मोठी आहे. तालुक्यातील सर्व गावांना एसटीची बस पाठविणे तेथून प्रवाशांची ने-आण करणे आणि देगलूर – नांदेड, देगलूर पुणे, देगलूर पंढरपूर, देगलूर – – संभाजीनगर नागपूर चंद्रपूर माहूर हैदाबाद अशा लांब पल्ल्याच्या शहरात जाण्यासाठी तसेच आजूबाजूच्या तालुक्यात प्रवास करण्यासाठी देगलूर आगाराला जवळपास १०० शेड्युलची आवश्यकता आहे; परंतु सध्या देगलूर आगाराचे केवळ ५६ शेड्युल सुरू आहेत.
देगलूर आगारातील कांही कर्मचारी ड्युटी करताना जाणून बुजून कुचराई करतात. प्रवाशांना योग्य वागणूक देत नाहीत. आवश्यक त्या ठिकाणी गाड्या थांबवित नाहीत. कांहीजण प्रवाशांना अर्वाच्च बोलतात, अशा प्रवाशांनी आगार प्रमुखांकडे तक्रार केली तर आगार प्रमुख कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत. याउलट चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करतात. वाढलेली प्रवासी संख्या, नादुरुस्त बस गाड्या कर्मचाऱ्यांचे असभ्य वर्तन अशा अनेक कारणांमुळे पूर्ण प्रवासभाडे भरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून प्रवाशांना योग्य सुविधा कशी देण्यात येईल याकडे लक्ष घातले पाहिजे.