दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलुरः सरकारी यंत्रणांचा विरोधी पक्षांवर वाढलेला दबाव, सुडबुद्धीने विरोधी पक्षावर होणाऱ्या कारवाया, मानवी हक्कांची होणारी पायमल्ली,दलित अत्याचारांची न संपणारी मालिका, सरकारी कंपन्यांचे वेगाने सुरु असेलेले खाजगीकरण, ओस पडत चाललेल्या सरकारी शाळा आणि खाजगी इंग्रजी शाळेला आलेला उत व या सर्वांना खतपाणी घालणारी व लोकशाहीला कमकुवत बनवणारी सरकारची धोरणे लक्षात घेता संविधानावर प्रेम करणाऱ्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सक्षम लोकशाही बनवण्यासाठी नागरिकांनी विचारमंथन करुन हुकुमशाहीने झपाटलेल्या राज्यकर्त्यांच्या जबड्यातुन लोकशाही वाचवण्यासाठी रणनिती आखणे काळाची गरज आहे.त्यामुळे
महात्मा फुले,डॉ .बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर या महान लोकशाहीवादी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लोकशाही मार्गाने लोकचळवळ चालवणार्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करुन व लोकशाहीवादी तथा संविधानवादी पक्ष, संघटनांना संघटित करुन “लोकतंत्र बचाव परिषद” ऑल इंडिया पँथर सेनेच्या पुढाकाराने देगलुर नगरपरिषद, देगलुर मैदानात आयोजित केली होती. अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष किरण फुगारे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.
संविधानाची योग्य अंमलबजावणी या देशात होताना दिसत नाही. त्यामुळे लोकशाही शासन व्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे. हे आंबेडकरवादी म्हणून आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहु शकत नाही. सत्तालालसेपोटी मुख्यप्रवाहातील पक्ष संघटना मुक्तपणे व सर्वशक्तिनिशी लोकशाही बचाव चळवळ हाती घेत नाहीत. लोकशाही व्यवस्था या देशात टिकली नाही तर या देशातला शोषित,वंचित, पिडीत , सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत समाज सर्वात जास्त बाधित होईल. त्यामुळे या सर्व दुर्बल समाजघटकांचं नेतृत्व करणारी आंबेडकरवादी चळवळ ही लोकशाहीची रोज निघणारी धिंड उघड्या डोळ्यांनी पाहु शकत नाही. त्यामुळे लोकशाही वाचवण्याची चळवळ देशात आंबेडकरवादीच गतीमान करु शकतात. असे माझे ठाम मत आहे असे प्रतिपादन ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी केले आहे.
तसेच युवा व्याख्यात्या प्रियंकाताई गायकवाड यांनी भारतीय संविधान समजुन घेऊन आणि लोकशाही शासन व्यवस्था कशी मजबुत करता येईल यावर सविस्तर विवेचन केले. प्रसिद्ध गायक विलास ढवळे यांच्या क्रांतिकारी गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या परिषदेला देगलुर-बिलोली परिसरातील युवक, विद्यार्थी , सामाजिक कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या परिषदेला उपस्थित प्रमुख पाहुणे धोंडीबाजी कांबळे ,वाय.जी.
सोनकांबळे ,पंडित वाघमारे,राजा कांबळे, मिलींद बिरकंगण,गोपाळ इंगळे होते तर परिषदेचे अध्यक्ष विनोद भोळे होते तर सुत्रसंचालन किरण बोईवार यांनी केले. या परिषदेला यशस्वी करण्यासाठी विजय शेरे, संदीप वाघमारे,सुमेध वाघमारे,सुनील वाघमारे,पंचशिल शेरे आदिंनी परिश्रम घेतले.