दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
भारतीय समाज हा शेकडो वर्षापासून सामाजिक स्थित्यंतराचा अनुभव घेत आहे. अस्पृश्यता ,सतीप्रथा,विधवा ,केशवपन ,जातीभेद ,धार्मिक श्रेष्ठत्वाचा वाद, श्रद्धा अंधश्रद्धा वाद, यां सारख्या जुन्या परंपरा ,अनिष्ट प्रथा , जुने सांस्कृतिक विचार यांना मुठमाती देऊन समाज सुधारकांनी येथील लोकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. संतांनी भक्तीच्या मार्गाचे अनुकरण करत लोकांना अध्यात्मिक मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. फक्त अध्यात्मिक मार्गाकडेच नेण्याचा प्रयत्न केला नाही तर वैचारिक बैठक उंचावण्याचा प्रयत्न केला. लोकांचे प्रबोधन केले.आचरण शुद्ध असावे.श्रद्धा डोळस असावी. रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणावे हे संतांनी वारंवार स्पष्ट केले. त्यानंतर संत गाडगेबाबा ,महात्मा फुले , संत कबीर ,राजर्षी शाहू महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , पेरियार, राजाराम मोहनरॉय यांनी भारतीय समाजातील कुप्रथावर हल्ला केला.त्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी किर्तन ,भजन ,लेखन ,भाषण ,आंदोलन ,चळवळ या आयुधांचा वापर केला. इथल्या समाजव्यवस्थेविरूद्ध लढा दिला. अनिष्ट प्रथांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. काही अंशी त्यांना यश आले.तर काही अंशी अपयश आले. भारतीय स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या चळवळीला विधायक स्वरूप, विधायक अधिष्ठान देण्याचे काम घटनेच्या माध्यमातून केले. घटनेमध्ये सर्वाना एकाच पातळीवर आणून ठेवले.समतेचा , न्यायाचा विचार केला .श्रद्धा , अंधश्रद्धा , धार्मिक स्वातंत्र्य , सामाजिक सलोखा यावर कलमे आली. त्यामुळे भारतीय समाजात घटनेच्या धर्तीवर वैचारिक स्थित्यंतर घडत होते. भारतीय समाज प्रगल्भ होऊ लागला होता. अनिष्ट चालीरीती यांना मुठमाती देऊन शिक्षणास प्राधान्य देत होता.जगाकडे विद्यार्थ्यांच्या नजरेने पाहत चांगले तेवढे घेत होता.काही अंशी समाज सुधारणा झाल्या होत्या.अजून समाज सुधारणांना बराचसा वाव होता.
पुन्हा भारतीय समाज वैचारिक स्थित्यंतराचा अनुभव घेत आहे. पुन्हा एकदा कर्मठ विचारांनी उचल खाल्ली. स्वातंत्र्यानंतर कर्मठ विचार ,कर्मकांड, सनातन धर्म यांचा उच्चार करायला लोक संकोच करत होते. तेच लोक आज पुन्हा एकदा अभिमानाने त्या विचारांचा जयघोष करत आहेत . पुरस्कार करत आहेत. त्याला जबाबदार इथले शासक आणि राज्यकर्ते आहेत . अविवेकी विचार मोठ्या विवेकाने मिरवत आहेत. मनगटशाही वाढत आहे. मनगटशाहीच्या जोरावर दुसऱ्याचे विचार दाबले जात आहेत. दुसऱ्यांना कमी लेखले जात आहे. वर्चस्वावादाची भुमिका अभिमानाने स्विकारत आहेत. जे भारतीय समाज व्यवस्थेला मारक आहे. भारतीय संस्कृती म्हणून अनिष्ट प्रथांचा जयजयकार केला जात आहे. पुन्हा एकदा भारतीय समाज नैराश्याच्या गर्तेत गटांगळ्या खात आहे. यात एक आशावाद असा आहे की , आजही पुरोगामी विचारांचा पुरस्कार आणि प्रसार करणाऱ्यांचा , पुरोगामी विचार आत्मसात करणाऱ्यांचा प्रभाव टिकून आहे. त्याचबरोबर गावोगावी वैचारिक जागर होत आहे. वैचारिक आणि आचरणाची क्रांती सर्वत्र पहायला आढळून येत आहे. याचे श्रेय शिक्षण आणि संविधान या दोन बाबींना जाते. महापुरुष जातीत विभागले गेले परंतु सकारात्मक बाब अशी की महापुरुषांच्या संयुक्त जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत. त्याच व्याख्याने, प्रबोधनपर किर्तने ठेवले जात आहेत.
नांदेड जिल्ह्यातील दिग्रस बु.गावात असाच संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. बसवेश्वर महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , या महापुरूषांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री सत्यपाल महाराज ,अकोले अहमदनगर यांचे किर्तन झाले. त्यांनी किर्तनातून संतांच्या विचाराचा जागर तर केलाच.त्यामध्ये संत तुकाराम ,संत तुकडोजी महाराज ,गाडगेबाबा यांचा मानवतावादी दृष्टिकोन समाजासमोर मांडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची ,क्रांतीची ओळख समाजास करून देण्याचे प्रयत्न केले. किर्तनातून अंधश्रद्धेच्या विळख्यात आपण कसे अडकतो यावर भाष्य केले. किर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार ही एक सामाजिक आणि वैचारिक क्रांती म्हणावी लागेल. सत्यपाल महाराज म्हणतात, शिक्षण घेणे, साक्षर होणे ही एक बाब आणि शिक्षण घेतल्यावर त्याप्रमाणे वागणे ही दुसरी बाब.ज्यात बहुतांश लोक अपयशी ठरतात. किर्तनातून ते लोकांना महापुरूषांवर प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरे देणाऱ्यांना पुस्तके देतात. मानवतावादी दृष्टिकोन सर्वानी बाळगायला हवा हे ठासून सांगतात. बुद्धाचे विचार किर्तनातून प्रसारित करतात. ही क्रांतीच म्हणावी लागेल.त्याच किर्तनाला अठरा पगड जातीचे लोक एकत्र येऊन ते ऐकतात हे पण गावखेड्यात सामाजिक स्थित्यंतराचे अप्रतिम उदाहरण म्हणावे लागेल. काही लोक आजही विखारी वागतात. हिणकसपणे जातीचा उल्लेख करतात. आजही गावात सुशिक्षित लोक, जे शिक्षक म्हणून वावरतात ,सरपंच उपसरपंच पदावर विराजमान होतात पण त्यांच्या वावरण्यात बोलण्यात त्या उच्च जातीचा दर्प आढळून येतो.त्याच गावात सत्यपाल महाराज येऊन जातीप्रथेवर ,अंधश्रद्धेवर ,ब्राह्मणी कर्मकांडावर घाव घालतो.हे सामाजिक क्रांतीचे द्योतक म्हणावे लागेल.या सामाजिक क्रांतीचा पाईक आपण सर्वाना व्हायला हवे..काय हरकत आहे.. मानसाला माणूस म्हणणे आणि समानतेच्या धाग्यात विणणे.. हे काही चुकीचे आहे काय?
संकलन सतिश सोपानराव यानभुरे साहित्यिक , लेखक तथा कवी जिल्हा परिषद सहशिक्षक पुणे