दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरात हजारो ठिकाणी रस्त्यालगतची बीपी बॉक्स सताड उघडी असतात. त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने असलेले लोखंडी दरवाजे कर्तव्यावरील अधिकारी वा कर्मचारी कोणीही कधीच बंद करीत नाहीत. शिवाय कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात होत असलेली कसूर सुधारली जावी म्हणून वरिष्ठही कधी त्या कर्मचाऱ्यांना तगादा लावताना आढळून येत नाहीत. त्याचाच गैरफायदा घेऊन विभागातील कोणीही नागरिक आपल्या सोयीनुसार सताड उघड्या बीपी बॉक्समधील वायरी इकडून तिकडे फिरवतांना म्हणजेच छेडछाड करतांना आढळून येत असते. त्याचाच परिपाक म्हणून त्या त्या विभागात सततची वीज गायब होत असते. अचानकपणे सातत्याने होणाऱ्या अशा वीज लपंडावामुळे कित्येकांच्या घरांतील किंमती उपकरणे मोठ्या प्रमाणात बिघडली जातात. कधी कधी तर ती साफ कामातूनच वाया जातात. परिणामी अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शहरातल्या प्रत्येक ठिकाणी कार्यरत डीपी बॉक्सचे दोन्ही दरवाजे लावून बंद करणे प्रतिबंधात्मक असूनही ते कधीच बंद केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वीज महामंडळातील कर्मचारी व वीजेचा खेळ खंडोबा करणाऱ्या ठगांची मिलीभगत तर नसावी ना, अशी शंका आल्यास चुकीचं ठरु नये. जर तसे नसते तर उघड्या बीपी बॉक्सवर नजर ठेवून सदान् कदा घुटमळणाऱ्या छेडछाड करणाऱ्या महाठगांच्या संख्येत आणि वारंवार वीज गुल होण्याच्या प्रकारात वाढ झालीच नसती.
असे प्रकार वाढीस लागले जाऊ नये म्हणून प्रत्येक विभागातील कार्यरत बीपी बॉक्स हे दोन्ही दरवाजे लावून बंद केलेच पाहिजेत, अशी कायमची सक्ती असणे आवश्यक आहे. ज्या विभागातील बीपी बॉक्स उघडे आढळून येतील, त्या परिसरात कर्तव्यावरील कर्मचारी व अधिकारीच त्याला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणे आवश्यक आहे. अशी सक्तीची कारवाई केली गेल्यास अन्य दुसरे कोणीही त्या बीपी बॉक्सची छेडछाड करणार नाही किंवा कोणाच्याही वीज कनेक्शनच्या वायरी इकडच्या तिकडे होऊन कोणाचीही अचानक वीज कधीच जाणार नाही.
आपल्या स्वार्थी कृत्यासाठी किंवा अन्य कोणाची सुपारी घेऊन वारंवार छेडछेड करण्याचे प्रकार जे कोणी करीत असतात, त्यांच्या त्या कृतीमुळे वीज सारखी सारखी गुल झाली तर अनेकांना त्याचा त्रास तर होत असतोच पर्यायाने मंडळ किंवा कर्तव्यावरील कर्मचारी व अधिकारी सुध्दा बदनामीस पात्र ठरले जातात. असे कोणतेही गैर प्रकार होऊ नयेत यासाठी कोणताच बीपी बॉक्स उघडा राहिला जाऊ नये यासाठी सक्तीचे नियम करुन ते अंमलात आणले गेल्यास वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडले जाणार नाहीत एवढे नक्की.
वीज महामंडळ हे स्वायत मंडळ असले तरी त्यावर शासनाचेच नियंत्रण आहे, हे मुळीच नाकारता येणार नाही. ज्यामुळे वारंवार वीज गुल होणे, वीजेच्या जुनाट वायर वेळेवर बदली न केल्याने त्या तुटणे किंवा वीज पुरवठ्यात खंड पडणे, वारंवार वीज जाण्यामुळे महागडी उपकरणे बिघडणे, परिणामी आर्थिक भुर्दंड बसणे, वीज गुल होऊनही किंवा कमी वापर करुनही प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात बील येणे, नियमित बीले अदा करुनही त्रास सहन करणे, विभागातील काही लोकांनी बीले न भरता तसाच अधिक काळ वापर करणे किंवा कोणी तरी आकडे टाकून वीजेचा गैर वापर करतात म्हणून वेळेवर बीले अदा करणाऱ्यांना त्यांच्यासाठी त्रास देण्याचे प्रकार बऱ्याचदा आढळून येतात. त्यामुळे सरसकट वीज मंडळालाच जबाबदार धरले जाते, परंतु तेही संयुक्तिक ठरणारे नसते.
ग्राहक आणि वीज मंडळ यातील दुवा ठरणारे कर्मचारी व अधिकारी आपले कर्तव्य तत्परतेने पार पाडून सौर्हादाचे नाते सलोख्याने जोपासतील तर कोणामध्येच कटुता निर्माण होणार नाही. तथापि कर्तव्यावरील कर्मचारी व अधिकारी सुध्दा मानवच असतात. किंबहुना मानव असलेल्या ग्राहकालाही मंडळातील कोणाकडूनही कमी लेखले जाता कामा नये. सलोखा व सौर्हाद्रता हेच मानवरुपी सेवेची दोन मजबूत चाके आहेत. यांचे भान दोन्ही बाजूंनी आवश्यक असते अगत्याचे आहे.
आपण ज्या कर्तव्याची धुरा पार पाडतो, त्या वीज मंडळाच्या डीपी बॉक्सची दारे कुठेही उघडी राहाता कामा नये याचे भान ठेवूनच प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. सताड उघडे राहिले जाणाऱ्या त्या बीपी बॉक्स ची उंची जमिनीपासून अगदी एक-दोन फूटांच्या अंतरावर म्हणजे फारच कमी प्रमाणात असते. त्यामुळे सहजच ते लहान लहान मुलांच्या हाताला अगदी सहजपणे लागले जाते, याचा विसर पडता कामा नये. अन्यथा त्याचा दगा-फटका कोणाच्या तरी मुलाला बसला जातो, परिणामी जी वेळ अन्य जणांवर येऊ शकते, तीच आपल्यावर किंवा आपल्या मुलांवर येऊन ठेपली तर काळाचा घाला तो कोणालाही असह्य करणाराच असतो. तद्वतच ती वेळ कोणावरही येऊ नये अशी आमची विनम्र प्रार्थना आहे. धरतीवर जन्मलेला कोणीही आपला दुष्मन नसतो. त्या प्रत्येकांच्या प्रति आदराची भावना बाळगून आपले कर्तव्य प्रत्येकाने इमाने इतबारे पार पाडले तर समोरच्यांकडूनही तीच अपेक्षा आपण करु शकतो. वैचारिक मतभेद असू शकतात परंतु मनभेद असू नयेत. ज्यामुळे मानवतेला बट्टा लागला जाईल.
आपल्या खात्यातील भयंकर, असह्य, त्रासदायक तथा जीवघेण्या वीज उपक्रमामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे प्रत्येकाचेच कर्तव्य ठरलं जातं. हवं तर त्यासाठी कठोर नियमावलीचा अंमल करणे भाग पडले तरी चालेल परंतु कर्तव्यात कसूर होता कामा नये, ज्यामुळे कोणालाही दगा-फटका बसू नये.
आशा आहे की, ही जाणीव ओळखून शहरातील कोणत्याच बीपी बॉक्सची दारे उघडी ठेवली जाणार नाहीत, याचा प्रत्येकाने आपल्या मनावर दंडक लावून घेणे गरजेचे आहे तर आणि तरच भविष्यात कुठेही वीजेचा धक्का लागून अपघात होणार नाहीत, हीच भावना जोपासली गेली पाहिजे. असे कर्तव्य पार पाडले गेले तर आणि सर्वच डीपी बॉक्स बंद ठेवून दक्षता घेतली गेली तर दैनिक चालू वार्ता तर्फे त्या कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल, असे मी या निमित्ताने अभिवचन देत आहे, याचीही नोंद घ्यावी म्हणजे सत्काराचे उपक्रम राबवता येतील.