दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : नांदेड-मनमाड लोहमार्गावर सिग्नल टेंपरिंग करुन अजिंठा एक्सप्रेस लूटण्याचा झालेला प्रयत्न कर्तव्यावरील सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे पूरता हाणून पाडला गेला अन्यथा भयंकर अनर्थ ओढवला गेला असता. सोमवारी मध्यरात्री नंतर सुमारे दोनच्या दरम्यान मनमाडहून नांदेड कडे येणाऱ्या अजिंठा एक्सप्रेसला परभणी जवळील पेडगाव परिसरात ही घटना घडली आहे.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून अशाप्रकारे सिग्नल टेंपरिंगचे प्रकार घडवून आणले जाऊन त्यात मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना लूटीचे प्रकार या दरम्यान होत आलेले आहेत. रात्रीच्या वेळेत लांब पल्ल्याच्या ज्या काही रेल्वे धावत असतात, त्या रेल्वेंमधून सुरक्षा यंत्रणेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली जावी म्हणून मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघातर्फे वारंवार करण्यात आली आहे. तथापि त्या मागणीकडे द.म.रे. नांदेड विभागीय नियंत्रकांतर्फे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करण्यात आले आहे. प्रवासी नागरिकांच्या जीवाशी वेठीस धरण्याचा हा कुटील डाव यापुढे चालला जाणार नाही. कर्तव्यावरील सुरक्षा यंत्रणेने तुटपूंज्या संख्येत असूनही जी सतर्कता दाखविली गेली, ती अत्यंत कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल. जर ती सतर्कता दाखविली गेली नसती तर मात्र भयंकर मोठा अनर्थ ओढवला गेला असता, हे मुळीच नाकारता येणारे नाही.
या घटनेबाबत जी माहिती पुढे आली आहे, ती अत्यंत धक्कादायक अशीच म्हणावी लागेल. मनमाडहून सिकंदराबाद कडे दैनंदिन धावणारी अजिंठा एक्सप्रेस सोमवारी मध्यरात्री नंतर दोनच्या सुमारास पेडगाव रेल्वे स्थानक परिसरात आली. सदर एक्स्प्रेसला पेडगाव रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने तिला तेथे हिरवा सिग्नल देण्यात आला परंतु पेडगाव स्थानक पार करताच परभणीच्या दिशेकडील होम सिग्नल जवळ अज्ज्ञात दहा-पंधरा चोरट्यांनी सिग्नल टेंपरिंग करत सदर गाडीला सिग्नलवर रोखले. कर्तव्यावरील तैनात रेल्वे सुरक्षा बलाचे सशस्त्र जवान यांनी सतर्कता बाळगत गाडी थांबताच धडाधड खाली उड्या मारल्या व सिग्नलकडे जोमाने धावत कूच केली. पोलीस आपल्याकडे येत असल्याचे बघून सदर दहा-पंधरा चोरट्यांनी त्या जवानांवरच तूफान दगडफेक सुरू केली. तरीही जवान न घाबरता तसेच त्यांच्या दिशेने धावत सुटले त्यामुळे चोरट्यांना पळ काढावा लागला. परिणामी तासभर खोळंबलेल्या अजिंठा एक्सप्रेसमध्ये मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच सदर गाडी परभणीच्या दिशेने धावली गेली.
दरम्यान, सिग्नल टेंपरिंगचे प्रकार नांदेड-मनमाड दरम्यान वारंवार घडले जात असून प्रवासी नागरिकांवर सुरक्षेची ती टांगती तलवार कायमच लटकत राहिली जात आहे. रात्रीचा व लांब पल्ल्याच्या गाडीतील प्रवास सुखकर व्हावा यासाठी या गाड्यांमध्ये सुरक्षा जवानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविली जावी अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघातर्फे वारंवार करण्यात आली आहे. तथापि व.म.रे.चे नांदेड विभागीय नियंत्रक जाणीवपूर्वक दूर्लक्ष करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालू पहात असावे का, असा घणाघाती आरोप ज्येष्ठ पत्रकार तथा महासंघाचे सदस्य दत्तात्रय वामनराव कराळे यांनी केला आहे. वेळीच सुधारणा न झाल्यास महासंघातर्फे पुढील दिशा लवकरच ठरविली जाईल असेही ते म्हणाले.