दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
20 वर्षात प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वडिलोपार्जित जमिनी साठी जोगदंड कुटुंबाने गमावले 2 जीव प्रशासन आणखी किती बळी घेणार
बीड/केज–:केज तालुक्यातील येवता येथील पीडित जोगदंड कुटुंबातील पती-पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत आरोपीना कडक शासन करावे व आरोपीच्या ताब्यात असलेली जमीन मिळवून द्यावी यासाठी पीडित जोगदंड कुटुंबाने बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ व पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेत घडलेली आपबीती सांगताच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जोगदंड कुटूंबाला धीर देत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
ज्या वडिलोपार्जित जमिनी साठी पीडित जोगदंड कुटुंब 20-25 वर्षांपासून लढा देत आहे येवता ता. केज येथे सचिन सुभाष जोगदंड यांची जमीन आहे. सदरील जमीन त्यांच्या चुलत चुलत्याच्या नावे होती सचिन वडिल कै.सुभाष जोगदंड यांनी ती जमीन नावे होण्यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला परंतु शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आत्महत्येचा इशारा देवून सुद्धा कोणतीही कारवाई न केल्याने इशारा दिलेल्या तारखेस 2005 साली आत्महत्या केली. तदनंतर प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करत सुभाष जोगदंड यांची जमीन सचिन व निलेश जोगदंड यांच्या नावे केली.मात्र जमीन कब्जेदार बसवर यांनी अद्याप ही ताब्यात दिलेली नाही.
सुभाष जोगदंड यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांची मुले सदरील जमीन ताब्यात घेण्यासाठी शारदाबाई जोगदंड यांनी सातत्याने महसूल, पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला तसेच जोगदंड यांच्या मालकीच्या जमिनीवर कब्जा असणारे बसवर यांच्या कडे विनवण्या केल्या परंतु सातत्याने शारदाबाई ला अपमानास्पद वागणूक दिली.एकवेळी मोजणी झाल्यानंतर जमीन ताब्यात देवू असे कब्जेदार बसवर यांनी बॉण्ड वर ही लिहून दिले मात्र चालढकल करत अद्याप ही जमीन ताब्यात दिली नाही.पीडित कुटुंब जेव्हा जमीन ताब्यात घेण्यासाठी साठी गेलो तेंव्हा तुमच्या कुटुंबाला जीवे मारू अश्या धमक्या देत अनेकदा मारहाण झाली. मे महिन्यात शारदाबाई जमीन कब्जेदार बसवर व अर्जुन जोगदंड यांना आता तरी आमची जमीन द्या अशी मागणी करायला गेली असता शारदाबाईला इथं तुमची जमीन नाही परत आला तर खोदलेल्या खड्ड्यात जिवंत गाडू अशी धमकी देत शिवीगाळ करत मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने तसेच 20 वर्षाने महसूल व पोलीस प्रशासनाने पाठपुरावा करुन सुद्धा कोणतीच दखल घेतली नसल्याने सातत्याने होणाऱ्या बसवर व अर्जुन जोगदंड यांच्या दडपशाही त्रासास कंटाळून शारदाबाई जोगदंड यांनी अंबाजोगाई येथे औषध प्राशन करत आत्महत्या केली.
एकाच कारणावरून पती-पत्नी च्या आत्महत्येस कारणीभूत असलेले आरोपी बसवर व अर्जुन जोगदंड हे धनदांडगे असून साम दाम दंड वापरून प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरफायदा घेत मोकाट फिरत आहेत.या प्रकरणी गुन्हा दाखल असताना बिट अंमलदार उमेश आघाव व तपास अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही . तसेच पीडित कुटुंबियांचे जबाब परस्पर लिहले असल्याची शंका पीडित जोगदंड कुटुंब व्यक्त करत असून 2 जुलै रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे कुटुंबासह न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला पीडित जोगदंड कुटुंबाची व्यथा मा.जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सविस्तर ऐकूण घेत आस्थेवाईक पणे चौकशी करत पीडित जोगदंड कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.