तालूक्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार
जिल्हाधिकारी यांची माहिती…
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील चार तहसील कार्यालयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचे जाहीर केले. परंतू १९८५ पासून तालूक्याची मागणी असलेल्या उस्माननगर वर अन्याय केल्याची भावना जनसामान्यांच्या मनात निर्माण झाली. या भागाचे लोकप्रिय आमदार मा. शामसूंदर शिंदे यांच्याकडे या भागातील जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या विनंतीला मान देत तात्काळ आ. शिंदे यांनी बालाजीराव पांडागळे, बाबूराव पांडागळे व गावक-यांच्या समवेत मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी बोलतांना मा. जिल्हाधिकारी यांनी उस्माननगरचा तालूक्याचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्याची ग्वाही दिली.
उस्माननगर हे गाव लोहा – कंधार विधानसभा मतदार संघातील मध्यवर्ती ठिकाण असून १९८५ पासून ह्या भागाला तालुक्याचा दर्जा द्यावा ही शासन दरबारी मागणी आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय तालुके निर्मिती कृती समिती अजिंठा जि. औरंगाबाद आणि उस्माननगर विकास परिषदेच्या माध्यमातून परिसरातील नागरिक सतत पाठपुरावा करत आहेत. मा. खासदार, मा. आमदार, विविध पक्षांचे राजकीय पुढारी यांनीही या संदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केला असून ९० ते १०० गावांना सोयीचे ठरणारे उस्माननगर हे गाव शासनाच्या नव्याने पूनर्रचित होणाऱ्या तालुका निर्मितीत महत्त्वाचे आहे. कुणबी कागदपत्रांची पाहणी करीत असताना उस्माननगर हा तत्कालीन तालुका असल्याचे पुरावे सापडत असल्याची चर्चा आहे. कंधार – लोहाचे विभाजन करून तालुका केल्यास जिल्ह्यात चार जिल्हा परिषदचा मोठा तालुका होईल. टपाल खात्याचे मंडळ कार्यालय, ६७ गावांचा कारभार पाहणारे पोलीस स्टेशन, अनेक मराठी, इंग्रजी, उर्दू शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सिनियर कॉलेज, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक सज्जा, बीएसएनएल कार्यालय, अनेक विभागाचे भूमी अभिलेख कार्यालय, ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी आदी तालुका निर्मितीसाठीचे कार्यरत कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ A या दोन महामार्गावरील गाव.
वरील सर्व बाबी मा. जिल्हाधिकारी नितीन राऊत यांच्या निदर्शनास आणून देऊन आ. शिंदे साहेब, काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी तथा ग्रा.पं.सदस्य रशिद खान पठाण ,जिल्हा परिषद माजी शिक्षण समिती सदस्य माननीय बाबुराव पांडागळे, आदींनी चर्चा केली. यावेळी शिवा संघटनेचे श्री बसवेश्वर धोंडे, विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष गणेश लोखंडे, सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील, शेकाप नांदेड जिल्हाअध्यक्ष बालाजीराव इसादकर, प्रा.विजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते अमिन शहा फकीर, मनोहर पांचाळ, श्रीराम पाटील काळम, मुख्याध्यापक सोनसळे, कमलाकर शिंदे, गंगाधर भिसे, संदीप पाटील, प्रल्हाद पाटील, गंगाधर कांबळे, सय्यद मुबीन, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.