अस्सल ग्रामीण संस्कृतीचा अविष्कार…
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात माजी खासदार व आमदार कै.भाई डॉ.केशवराव धोंडगे प्रसिद्ध असलेलं नांव. साधी राहणी, विविध भाषेवर प्रभुत्व, उत्कृष्ट वक्ते, शब्दांचा स्वतंत्र कोष असणारे, सामान्यांच्या प्रश्रावर हळवे पण आक्रमक भूमिका घेऊन लढणारे योद्धे. भाईनी गुराखी शेतकरी, कष्टकरी, सालदार, मागासवर्गीय, उपेक्षित, वंचिताचे जिणं अन् त्याकडे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून तीन दशकापूर्वी गुराखीगडावर जागतिक गुराखी साहित्य संमेलन आयोजित करण्याची संकल्पना मुर्तस्वरूपात आणली. २९ वे गुराखी साहित्य संमेलन २६ जानेवारी पासून गुराखीगडावर भरत आहे. मौखिक साहित्यिकांच्या मोठया मांदियाळीतून ग्रामीण लोकजीवन व संस्कृतीचा अस्सल अविष्कार असतो. रसिक, प्रेक्षक, नागरिक, विद्यार्थ्यांना जनसामान्यांच्या प्रश्रावर लढण्याची उर्जा देणारी असते.
राज्य व केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही. अक्षर ओळख नसलेला, सण-वाराला सुट्टी नाही, वयोमर्यादेची अट नाही, कसलेच पेन्शन नाही. मुक्या गुरा-ढोरा बरोबर रमणारा गुराखी हजारो वर्षापासून दुर्लक्षित असला तरी मौखिक कला व संस्कृतीत सरस असतो. त्यांना हक्क व न्याय मिळावा. दारिद्रय, विषमता, अन्याय व अत्याचारा विरोधातील लढयाला बळ मिळावे. शासनाच्या अन्यायी निती विरोधाचा अचूक वेध घेण्याची उर्जा मिळावी. यासाठी भाई डॉ.केशवराव धोंडगे यांनी १९९१ ला गुराखीगड ता.लोहा येथे जागतिक गुराखी साहित्य संमेलन सुरू केले.
अफालातून अशा साहित्य संमेलनात गुरे चारत असताना व वळतानाची गायलेली भारूडे, दळण दळताना, फुगडी खेळताना व भूलईतील गाणे, जात्यावरील ओवी, निंदण-खुरपणी व कापूस वेचतानाची गाणे आदी कलाविष्कार घडतो. गुराखीराजे, कुणबीराजे, मेंढपाळराजे, सालदारराजे, बहुरूपी, मनकवडे, गोंदणवाले, नंदीबैलवाले, पालवाले, माकडवाले, सुग्या-मुग्या, माय माऊलींचा सहभाग लक्षवेधी असतो. स्त्री, पुरूष, बालके आपल्या कलेने रसिक जनतेला मंत्रमुग्ध करतात.
गुराखी साहित्य संमेलन निखळ कलेने भरलेले असते. अशा सुप्त कलेला संरक्षण देऊन जतन करण्याची आवश्यकता आहे. दुर्लक्षित व वंचिताचा सर्वांगीण विकास व्हावा. या व्यापक भूमिकेतून आयोजनाची संकल्पना भाई डॉ.केशवराव धोंडगे यांची होती. इतर साहित्य संमेलनाला शासन भरीव आर्थिक मदत देते. परंतु या संमेलना बाबतीत दूजाभाव केला जातो. असे भाई धोंडगे शासनावर आसूड ओढत असायचे. आता तरी शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोणतेही प्रशिक्षण नाही, कोणाचे मार्गदर्शन नाही. संगीत- वाद्याची साथ नाही, कोणतेही साधन नाही. परंतु घागर, परात, शिळ आदींच्या साहयाने साध्य केलेली आपली कला अविष्कार अफलातून सादर करतात. लाजऱ्या परंतु खडे बोल, बहारदार आवाजाचे सूर मात्र उपस्थितांना मात्र खिळवून ठेवतात.
भाई डॉ.केशवराव धोंडगे यांचे गतवर्षी निधन झाले. कोरोना काळाने गुराखी साहित्य संमेलन होऊ शकले नाही. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी आमदार भाई गुरूनाथराव कुरूडे, सहसचिव अॅड.मुक्तेश्वर धोंडगे व अध्यक्ष प्रा.डॉ.पुरूषोत्तम धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष माधवराव पेठकर, व्ही.जी.चव्हाण, प्राचार्य डॉ.अशोक गवते, प्र.प्राचार्य डॉ.सुर्यकांत जोगदंड, प्र.प्राचार्य डॉ.एम.एल. धर्मापूरीकर, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी प्रयत्न करत आहेत. भाई केशवराव धोंडगे यांची उणीव नक्कीच जाणवणार आहे.
चौकट
बाराव्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनात भाई केशवराव धोंडगे यांनी प्रेताजवळ होणारा नातेवाईकांचा आक्रोश हुबेहूब साकारला होता. मृत व्यक्तीची आठवण, जिवंतपणी केलेले कष्ट, भोगलेल्या यातना, स्वभाव, मित्र अन् नातेवाईकांसाठी केलेला त्याग आदी आठवणीने दुःखाला पारावर उरत नसतो. अशा स्त्री-पुरूष नातेवाईकांचा आक्रोश भाईनी साकारल्यावर त्यावेळी उपस्थित सर्व गुराखीराजे, ग्रामीण कलावंत, विद्यार्थी गहिवरले होते. अशी वैशिष्ट्यपूर्ण कलेची या संमेलनात आठवण होणे स्वाभाविक आहे.
डॉ.गंगाधर तोगरे
‘राजगड’ कंधार जि.नांदेड
मो.९४२३६५६३४५