“डॉ. संतोष कदम “स्वास्थ्य प्रहरी पुरस्काराने” सन्मानित.”
अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने रिपब्लिक डे मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते ,सभेची अध्यक्षता संदिपान तात्या हजारे – बीड जिल्हा कार्याध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक महेंद्र निकाळजे – ज्येष्ठ नेते रिपाइं, प्रमुख अतिथी :- भास्कर रोडे – राज्यसचिव रिपाइं, ऍडव्होकेट मकरंद पतकी, दिलीप गाडे – मराठवाडा उपाध्यक्ष रिपाइं, अजित दादा गरड – ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी पार्टी, उत्तमराव व्हावळे – मराठवाडा उपाध्यक्ष रिपाइं, स्वागत अध्यक्ष – मनोजभाऊ इंगळे, प्रास्ताविक – सिद्धार्थ शिंगारे – रिपब्लिकन विचारवंत यांनी केले. संचलन अशोक गडदे यांनी केले. आभार प्रदर्शन रोहिदास मस्के यांनी केले तर संयोजन अंबाजोगाई तालुका अध्यक्ष – महेंद्र कांबळे, शहराध्यक्ष – किशोर गोरे उपाध्यक्ष तेजस गंडले पप्पू कसबे यांनी यशस्वीपणे केले
रिपब्लिक डे मार्गदर्शन सभेचा प्रारंभ संविधानिक आदर्श तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाला. अतिथींच्या सत्कार समारंभा नंतर ज्येष्ठ गायिका नागिनी ताई गायकवाड, त्यांचे सहकारी गौतम सरवदे व विशाल गायकवाड यांनी “भीमसेही शान रहेगी इस भारत की देखना – दुनिया भी बात करेगी वो तथागत की देखना” या गीता द्वारे उपस्थितांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात उच्चविद्याविभूषित उत्कृष्ट हॉलीबॉलपटू, क्रीडा प्रशिक्षक व सोहम योगा ग्रुप अंबाजोगाईचे प्रमुख डॉ. संतोषजी कदम यांना पुरस्कार राशी 5 हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वास्थ्य प्रहरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विस्तृत प्रस्ताविकेत सिद्धार्थ शिंगारे म्हणाले की रिपब्लिक डे चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी असलेला संबंध रिपाइं कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन बांधवात विस्तृतपणे मांडला पाहिजे. रिपब्लिकन संकल्पना ही विश्वव्यापी आहे आज आम्ही युती आघाड्यात जरी असलो तरी राष्ट्र व आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या दिशेने पाऊल टाकावेच लागेल, असे ते म्हणाले.
भास्कर रोडे यांनी राष्ट्रभक्त डॉक्टरामदासजी आठवले यांचा संघर्ष विस्तृतपणे व स्वतःच्या सहभागासह, अनुभवासह कथन केला.
दिलीप गाडे म्हणाले की आज भारतीय समाजात अतिशय गोंधळलेली परिस्थिती निर्माण झालेली आहे. रिपाइं च्या माध्यमातून रिपब्लिकन भारत संविधानिक राजकारण व राष्ट्रभक्त डॉ. रामदासजी आठवले अशा विविध विषयांवर समाज प्रबोधन अभियान गतिमान झाले पाहिजे संविधानिक प्रबोधन केवळ आरपीआय करू शकते असे ते म्हणाले.
अजितदादा गरड यांनी आपल्या विशेष मार्गदर्शन शैलीतून उपस्थित त्यांचे प्रबोधन व अनुभव कथन केले. ते म्हणाले की, आपण मोकळ्या मनाने एकमेकांच्या जवळ आल्याशिवाय बंधुभाव वृद्धिंगत होणार नाही. त्यांच्या भाषणातून मराठा आरक्षणाबाबतची त्यांची आत्मियता स्पष्टपणे जाणवत होती. बिकट आर्थिक परिस्थिती, सामाजिक विषमता, संघर्षमय अनुभवाशिवाय भारतीय संविधानाचे महत्त्व माणसाला समजू शकत नाही. माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे हे जे विशाल मराठा आरक्षण आंदोलन उभे राहिले व निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचले हे केवळ भारतीय संविधानामुळे, असे त्यांनी अतिशय तळमळीने सांगितले व अठरापगड जातीने प्रबोधन प्रक्रिया गतिमान करून महाराष्ट्र व देश समृद्ध करावा. त्याचबरोबर डॉ. संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली योग अभ्यासाचे किस्से ही सांगितले व कदम सरांचा “स्वास्थ्य प्रहरी पुरस्कार” सन्मान किती आवश्यक आहे, हे विशद केले.
प्रमुख मार्गदर्शनात महेंद्र निकाळजे म्हणाले की आम्ही 26 जानेवारी 1950 रोजी पुनरुज्जीवीत संसदीय लोकशाही प्रणाली संविधानिक भारतात आहोत याचे भान ठेवले पाहिजे. मोहेंजोदडो हडप्पा – महाजनपद, शक्य संघ, बौद्ध भिकू संघ व भारतीय संसद या शंखलेत विचार करून आपल्या संसदीय लोकशाही संस्कृतीचा अभिमान बाळगून या संस्कृती तहत विश्व मार्गदर्शनाची जिद्द मनात बाळगून कृती कार्यक्रम आखले पाहिजेत. देशातील सामाजिक समतेसाठी तत्कालीन योगदान देणाऱ्या दिग्गजांचा आम्ही आदर करतो परंतु देशात पसरवल्या जाणाऱ्या प्रदूषणाकडे पाहता लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिकू संघ, धम्म प्रसारक सम्राट अशोक व रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांचे उदातीकरण मोठ्या प्रमाणात करावे लागेल. या प्रखर रिपब्लिकन राष्ट्रभक्तीने ओतप्रोत प्रतीकांच्या समोर प्रदूषणाच्या उद्देशाने मांडलेले सर्व काही खुजे आहेत.
त्याचबरोबर आज रिपब्लिक डे असताना तथागत गौतम बुद्ध, बौद्ध भिकू संघ, सम्राट अशोक व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करण्याऐवजी काही जातीग्रस्त बहुजनवादी बांधव उर बडवून घेण्याच्या कार्यक्रमात अडकत आहेत या सर्वांचे प्रबोधन करावे लागेल.
याच प्रसंगी माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलन लढा हा अभूतपूर्व आहे मराठा बांधवांना वंशावळीच्या आधारे ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण द्या या रिपाइं मूलभूत मागणीवर आधारित आहे ही मागणी शासन प्रशासनाने तात्काळ मान्य करावी व मराठा बांधवांना आरक्षण दिलेच पाहिजे असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात संदिपान हजारे म्हणाले की आम्ही डॉ.रामदासजी आठवले यांच्या समावेत पॅंथर पासून सक्रिय आहोत . १९५७ ला सत्ताधारी काँग्रेसने आरपीआय वर हल्ला केला त्यामुळे गट निर्माण झाले काँग्रेस इतक्यावरच थांबली नाही तर काँग्रेसने प्रमुख विरोधक असलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशन व नंतरच्या काळातील आरपीआय जनाधारावर हल्ले केले यातून दलित पॅंथर निर्माण झाली पंथरने गटातटात विभागलेल्या आरपीआय पण संघर्ष केला व डॉक्टर रामदासजी आठवलेंच्या नेतृत्वात भारतीय दलित पॅंथरचे आरपीआय मध्ये विलनीकरण करून आरपीआय पुनर्बांधणी केली या प्रवासातील विविध अनुभव त्यांनी कथन केले प्रारंभीपासून आमची मराठा बांधवांना सहानुभूतीच राहिलेली आहे परंतु आजच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात आम्ही संविधानाच्या अधिक जवळ आलो आहोत संविधानाचा सन्मान करून आम्ही आरक्षण तर मिळवलेच पाहिजे व संसदीय लोकशाही मजबूत करून सामाजिक समता प्रस्थापित करून संविधानिक बंधुभाव वृद्धिंगत केला पाहिजे असे ते म्हणाले.
बीड जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने संदिपान हजारे, बीड जिल्हा संघटक मनोज भाऊ इंगळे, राज्य सचिव भास्कर नाना रोडे व मराठवाडा संघटक दिलीप गाडे यांनी नवनियुक्त अंबाजोगाई तालुकाध्यक्ष महेंद्र कांबळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष किशोर गोरे व उपाध्यक्ष तेजस गंडले यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करून रिपब्लिकन शाखा पुनरुज्जीवन अभियान गतिमान करा, असे सांगितले.
या समारोहात विशेषता जेष्ठ गायिका नागिणीताई गायकवाड यांनी रिपाइं साठी खूप परिश्रम घेतले हे जाहीर केले. तसेच केज नगरीचे माजी सरपंच व माजी नगराध्यक्ष व्यंकटराव हजारे यांनी केज तालुक्यात गुणवान कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी संपर्क वाढवला आहे असे जाहीर केले. याच कार्यक्रमात नागीनीताई गायकवाड, व्यंकटराव हजारे व डॉ. संतोषजी कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले.