दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव नवनाथ यादव
धाराशिव/भूम:-आष्टा येथे सहशालेय उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा आनंद बाजार साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवून त्यांची विक्री केली .तसेच भाजीपाला, विविध वस्तू ,यांचीही विक्री करण्यात आली. या आनंद बाजारात 54 स्टॉल मांडण्यात आले होते. सर्व बाजारात मिळून पंधरा हजार रूपयांची उलाढाल झाली.या कार्यक्रमास केंद्राचे केंद्रप्रमुख उगलमुगले यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी गावातील तरुणांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जवाहर भोसले विठ्ठल सारुक,संजीवन तांबे, ज्ञानदेव कातुरे,अशोक नलवडे ,पुतळा पवार ,अनिता नाईकवाडी व विजयालक्ष्मी उपळकर यांनी कष्ट घेतले. स्टॉलमध्ये वडापाव, भजी ,अंडी,केळी चिप्स,ढोकळा,पाणीपुरी ,भेळ,तसेच विविध फळे व ताज्या भाज्यांचा समावेश होता. खाऊ गल्लीत विशेष गर्दी दिसून आली.विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान व्हावे यासाठी हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला.आपली विक्री जास्तीत जास्त व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. हा विलक्षण अनुभव विद्यार्थ्यांना योग्य व्यवहार ज्ञान देऊन गेला. गावातील एक अनेक शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथील शिक्षक व विद्यार्थी यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.सर्वांच्या सहकार्याने आनंदबाजार अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.