गोदाकाठावरील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…
दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर
शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास जायकवाडीतून आपेगाव व हिरडपूरी उच्च बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. पालकमंत्री भुमरे यांचे स्वागत सहायक नामदेवराव खराद यांच्या हस्ते नारळ फोडून जायकवाडी धरणाचे दरवाजा क्र. 18 मधून 50 क्युसेसने गोदापात्रात पाणी सोडण्यात आले. यावेळी शाखा विजय काकडे, अब्दुल गाजी, गणेश खराडकर, रामनाथ तांबे यांची उपस्थिती होती. गोदाकाठावरील अनेक गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीवरील आपेगाव व हिरडपूरी उच्च बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गोदाकाठावरील गावांतील ग्रामस्थांनी राज्य दुध संघाचे संचालक नंदलाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेत निवेदन देऊन धरणातून आपेगाव व हिरडपूरी बंधारे पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत पालकमंत्री भुमरे यांनी दोन दिवसांत बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी रात्री पालकमंत्री भुमरे यांचे स्वागत सहायक नामदेवराव खराद यांनी जायकवाडी धरणाच्या दरवाजा क्र. अठरा ची कळ दाबून दरवाज्यातून पन्नास क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आल्याने गोदाकाठावरील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान बंधाऱ्यात सोडण्यात येणाऱ्या पाणी निसर्गात टप्प्या टप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.