दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झाली. परवा (17 ऑक्टोबर) या निवडणुकीसाठीचं मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. 2001 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
त्यानंतर आज एकवीस वर्षानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गांधी परिवारातील कोणताही सदस्य सहभागी झाला नाही.
त्यामुळे, 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच बिगर-गांधी कुटुंबातील सदस्य काँग्रेसचा अध्यक्ष बनणार असल्याने ही घटना ऐतिहासिक मानली जात आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया 17 ऑक्टोबर रोजी पार पडली. या निवडणुकीत 96 टक्के मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस प्रदेश समित्यांच्या 9,900 प्रतिनिधींपैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत 100 टक्के, तर मोठ्या राज्यांत जवळपास 90 टक्के मतदान झाले होते.
देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडली.
9800 मतदार शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी एकाची निवड करतील. या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे 40 मतदार मतदान करणार आहेत, असं सांगण्यात आलं होतं.
पक्षाच्या मुख्यालयात 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल घोषित केले जातील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल 22 वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल 24 वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार आहे.
मतदारांनी मतदानपत्रिकेवरील उमेदवाराच्या नावापुढे मतदान करताना एक क्रमांक टाकावा, असे आधी ठरले होते. मात्र, या मतदानपत्रिकेवरील अनुक्रमानुसार पहिल्या क्रमांकावर मल्लिकार्जुन खर्गे व दुसऱ्या क्रमांकावर शशी थरूर यांचे नाव आहे. जर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे क्रमांक टाकून मतदान केल्यास गोंधळात भर पडेल व दोन क्रमांकावरील थरूर यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता थरूर गटाने व्यक्त केली होती.
काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या नावापुढे पसंतीची खूण करावी, असे आवाहन काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने केले आहे. पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी हा निर्णय जाहीर केला.