दैनिक चालु वार्ता भोकर तालुका प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार
:- तालुक्यात यावर्षी ४९ हजार ३०० हेक्टर जमीनीवर बळीराजा खरीप पिकांची पेरणी करणार असून २५ हजार हेक्टर वर कापसाची लागवड होण्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते यांनी वर्तवला आहे.
उन्हातान्हाची पर्वा न करता तालुक्यातील बळीराजांनी आपल्या जमिनीची खरीप पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली असून तो आता पेरणी साठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी तालुक्यातील खरीप पेरणी क्षत्र २०२३ मध्ये ४९ हजार ३३० हेक्टर असून शेतकरी २५००४ हेक्टरवर कापसाची लागवड करणार असून उर्वरित क्षेत्रामध्ये खालील प्रमाणे इतर पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे. सोयाबीन-१३३१४ हेक्टर, कडधान्ये पिके -५४८५ हेक्टर, हळद ३०००हेक्टर,चारा वर्गीय व भाजीपाला पिके ३००० हेक्टर जमीनीवर घेण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये बी बियाणे खते खरेदी करते वेळेस अधिकृत शासनमान्य कृषी सेवा केंद्रातून पक्के बिल घेऊनच खरेदी करावे. याबद्दल काही अडचणी असतील व कोणी वाढीव दराने विक्री करून फसवणूक करत असेल तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती भोकर येथे संपर्क साधावा. तशेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी शक्यतो सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे. बियाणे वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी जर उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा जास्त असेल तरच ते बियाणे पेरणी योग्य आहे असे समजून पेरणी करावी. पेरणीपूर्वी कीटकनाशके व जैविक संघाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.तशेच पेरणीसाठी कुठलीही घाई गडबड न करता १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.जेणेकरून दुबार पेरणीचा धोका टाळता येईल व भविष्यातील आर्थिक संकटावर मात करता येईल अशा सूचना सर्व शेतकऱ्यांना केले आहेत.