दैनिक चालू वार्ता, शहादा
प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शहादा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि संततधार पावसाचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असून मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन पपई चे फळे उघडी पडून खराब होत आहेत. एकूण पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असली तरीपण पपईच्या नुकसानीचे कुठलेही पंचनामे करण्यात आलेले नाहीत.
नंदुरबार जिल्ह्यात ,6400 हेक्टर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार हेक्टर क्षेत्र एकट्याचा शहादा तालुक्यात आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे. पपईच्या बागांमध्ये पाणी साचून असल्याने पपई बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्याचसोबत पपई बागांवर डवणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपई पिकावर मोठा परिणाम झाला आहे.
शेतकरी हैराण
पपईच्या झाडाची पाने पिवळी होऊन गळून पडत आहेत तर फळाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पपई बागा उध्वस्त होण्याच्या परिस्थितीत आहेत. कृषी विभागाच्या वतीने पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या परिसरात या रोगांच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रत्यक्षिक घ्यावीत, अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी गेल्या तीन-चार वर्षांपासून पपईवर पडणाऱ्या विविध रोगांमुळे हैराण झाले आहेत.
परतीच्या पावसानं कांद्याचंही नुकसान, दर भडकणार
परतीच्या पावसामुळे नवीन कांदा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत इतर राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमा केलेल्या जुन्या कांद्याची मागणी वाढत असून परिणाम म्हणून कांद्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांद्याला 50 ते 60 रुपये मिळत आहे. नवीन कांदा तयार होण्यास आणखी थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे कांद्याचे भावही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात परतीच्या पावसानं कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्रप्रदेश, तमिळनाडू मध्यप्रदेश, गुजरात मध्ये परतीचा मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकर्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, नवीन कांदा पीक नोव्हेंबर मध्ये तयार होणार आहे, त्या आधीच दिवाळी असल्यामुळे दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.