दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद : उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच औरंगाबादमधील नागरी समस्यांवर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यातील पाच महत्वाचे मुद्दे काय आहेत हे आपण पाहुयात.
१) काश्मीरचा हिंसाचार – हिंमत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन पंडितांची रक्षा करा, नामर्दांच हिंदूत्व आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर काश्मीरमध्ये जाऊन त्यांची रक्षा करा. हिंमत असेल तर काश्मीरमध्ये हनुमान चालीसा म्हणून दाखवा अशा शब्दांत त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला.
२) भोंगा प्रकरण – आज सगळं काही ठीक असताना भाजपा कुणाला तरी सुपारी देतं. हनुमान चालीसा पुढे आणतं, भोंग्याचा मुद्दा पुढे सरकवला जातो, अशा शब्दांत राज ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा, हा देश माझा धर्म म्हणून घराबाहेर पाऊल टाकायचं. जर कुणी धर्माचं वेड घेऊन आम्ही देशाभिमानी हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष आम्ही करत नाही.
३) शहराचा पाणी प्रश्न – मला मुद्दामून औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलायचे आहे. बाकीचे विषय महत्त्वाचे नाहीत. कुठेही फसवेगिरी नाही. जुन्या पाणी योजनांना पैसा देत आहोत. ती १९७२ ची योजना सडून गेली आहे. त्यासाठी पैसा देतोय. जी मेट्रो होईल ती शहराचे विद्रूपीकरण होणारी नसेल, ती औरंगाबादची शान वाढणारी असेल. महानगरपालिका मेट्रोचा आराखडा तयार करित असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. अगोदर चिकलठाणा विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यासाठी आक्रोश करा, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला लगावला आहे.
४) औरंगाबादचं नामांतर – जर तुमच्यामध्ये प्रमाणिकपणा असेल तर नुसतं नामांतर नाही तर संभाजी राजेंना अभिमान वाटेल असं शहर तयार करायचं आहे. नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहिजे. संभाजीनगर नाव करणार हे वचन बाळासाहेबांनी दिलं आहे ते पूर्ण करणार. शहराचं नाव बदलू शकतो. मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. पण विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राने का अडवून ठेवला
५) नुपूर शर्मा प्रकरण – भाजपची भूमिका देशाची भूमिका होवू शकत नाही. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढावली हे तुम्हाला मान्य आहे का? देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंड्यांवर लावला गेला त्याचं काय? भाजपच्या वाचाळ नेत्यांमुळं देशाची अब्रू गेली, याची भरपाई कोण करणार.