दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
भावी जिल्हा परीषद, पंचायत समिती उमेदवारांना नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी करावी लागणार कसरत
भूम:-तालुक्यातील आष्टा तसेच परिसरातील गावांना ग्रामीण भागांत विजेचा लपंडाव सतत सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री, बेरात्री सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो.
लहान मूल, वृद्ध व्यक्ती, शालेय विद्यार्थी , गृहिणी यांना विजेच्या अनिमित पुरवठ्यामुळे खुप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनी भारनियमन करते आहेच, परंतु त्याची वेळ नक्की नाही. अतिशय अनियमितपणे येथे विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे वाट्टेल त्यावेळी वीज जात असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. वेळेवर वीज बिल न भरल्यास कर्मचारी लगेचच वीज कापण्यास धावतात, मग न सांगता, अवेळी वीज गायब होते, तेव्हा हेच महावितरणचे कर्मचारी असतात कुठे? गेल्या वर्षी महाराष्ट्र भारनियमनमुक्त होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. तिचे पुढे काय झाले,असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
गेले काही दिवस तर सलग ८-८ तास सलग वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांतील कमी-अधिक दाबामुळे विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे. मात्र नागरिकांच्या या त्रासाशी काहीच देणंघेणं नसल्यासारखा महावितरणचा कारभार निवांत सुरू आहे.