देैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
मानवी जीवनात परमार्थ महत्वाचा असून अखंड , अव्याहत चालत आलेल्या साधनेला परंपरा म्हणतात श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या सप्ताहाच्या परंपरेला राज्यात विशेष महत्व असल्याचे प्रतिपादन संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान,त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे यांनी केले.
श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान फडाचा २७७ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दिनांक २ रोजी त्यांचे कीर्तन झाले या वेळी ते बोलत होते.
“काय नोहे केले , एका चिंतिता विठ्ठले” या अभंगावर विवेचन करताना ते म्हणाले की, योग, याग, तप या साधनेचे फळ नामस्मरणात आहे, इतर साधनांना नामस्मरणाची गरज आहे, मात्र नामसाधनाला दुसऱ्या साधनांची गरज लागत नाही, नामस्मरण साधना सर्व साधनांचे सार ठरते.मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या वृत्ती परमात्म्याला समर्पित केल्यावर भगवंत स्वरूप प्राप्त होते, विठ्ठल , विठ्ठल म्हणणारा स्वतः विठ्ठल होतो, संत साहित्याने समाजाला दिशा देण्याचे कार्य केले असे कोल्हे महाराज म्हणाले.