दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :– नवी दिल्लीत तिरंगा उत्सव सोहळ्यात सांस्कृतिक मंत्रालयाने 20 आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या कथांवर आधारित तिसऱ्या चित्रकथा(कॉमिक्स) पुस्तकाचे 2 ऑगस्ट रोजी प्रकाशन केले. या सोहळ्याला केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, संसदीय कामकाज राज्यमंत्री आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी उपस्थित होत्या.
या कथासंग्रहामध्ये जे आदिवासींचे प्रेरणास्थान आहेत आणि ज्यांनी ब्रिटिश साम्राज्य विरोधात लढताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा काही शूर पराक्रमी आदिवासी व्यक्ती आणि महिला यांच्या त्यागाची आठवण करून दिली आहे.
देशातल्या युवकांमध्ये आणि मुलांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातल्या दुर्लक्षित अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या बलिदानाविषयी आणि देशप्रेमाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून संस्कृतिक मंत्रालयाने अमर चित्रकथा(ACK) यांच्या सहकार्याने 75 स्वातंत्र्य सैनिकांविषयीच्या चित्रकथांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. अशा प्रकारचे पहिले अमरचित्रकथा पुस्तक 20 अशा महिला स्वातंत्र्यसेनानींवर आधारित आहे, ज्यांच्या कार्याची इतिहासात फारशी दखल घेतली गेली नव्हती. दुसरे चित्रकथा पुस्तक हे घटना समितीमध्ये समावेश असलेल्या 15 महिलांविषयी आहे. ही दोन्ही चित्रकथा पुस्तके या आधीच प्रकाशित झालेली आहेत.