दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राज्यात नव्हे देशभर सर्वत्र स्वातंत्र्याचा जयघोष सुरु असतांना परभणी शहरात मात्र काही नागरिकांना पारतंत्र्यात जीवन जगावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानावर आपल्या न्याय्य हक्कांबरोबरच अन्यायाविरोधात उपोषणाचं अस्त्र उडायचे भाग पडले आहे. वरुण राजाची रिमझिम सुरु असूनही जीवाची पर्वा न करता असंख्य महिला व पुरुष ठाण मांडून बसले आहेत तथापि प्रशासनाने मात्र या आंदोलन कर्त्यांकडे पूर्णपणे पाठ फिरविल्याचे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तर दुस-या बाजूला त्याच स्वतंत्र देशातील पारतंत्र्यात जगणारे नागरिक मात्र आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देत आहेत. कायद्याने प्रस्थापित हक्कासाठी शासनाकडे याचना करीत आहेत.
उपोषणासारखा मार्ग आजही अवलंबने भाग पडत आहे. यापेक्षा दुर्दैव ते कोणते असू शकते ? कोणालाही खंत वाटावी असाच काहीसा प्रकार परभणीत आजही उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतो आहे तरीही शासन-प्रशासनातील अधिकारी जाणिवपूर्वक गांधारी घ्या भूमिकेत वावरत आहेत.
परभणी येथील अनंता कुळकर्णी व त्यांची अर्धांगिनी वंदना अनंता हरिभाऊ कुळकर्णी हे दाम्पत्य आपल्या काही सहका-यांसह उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मालकीच्या जागेवर कोणीतरी जबरीने कब्जा करुन तेथे बांधकाम सुरु केले आहे. अशी त्यांची तक्रार आहे. अनुरथ सीताराम बनसोडे यांनी बांधकाम विभागातील अभियंते ए. एम्. विघ्ने व व्ही. बी. लव्हेकर यांनी गुत्तेदार यांच्याशी संगनमत करून विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमालीचा भ्रष्टाचार कले असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. अभियंता अरविंद कांबळे यांनी अनुसूचित जाती शहर वस्ती विकास योजनेअंतर्गत असलेले काम दुसरीकडेच केले असून या प्रकरणाची असून चौकशी केली जावी यासाठीच हे उपोषण असल्याचे समजते. महापालिका प्रशासनाने कोणताही आतबट्ट्याचा व्यवहार न करता सच्चोटीने हे प्रकरण हाताळावे अशीही मागणी आहे. विजय नागनाथ उफाडे यांनी पोलीस शिपाई पदाच्या दुरुपयोग करुन नव्हे खाकी वर्दीचा गैरमार्गाने धाक दाखवून गंगूबाई रुपचंद तायडे यांच्या प्लॉटवर जबरीने अतिक्रमण केले आहे. त्याचाच परिपाक म्हणून राजू रुपचंद तायडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचं अस्त्र उगारला आहे.
परभणी तालुका तहसील कार्यालयातील गरीब, निराधार तथा आश्रय नसणा-यांसाठी राबविण्यात येणाऱ्या गरीबी विरोधी धोरणाची असून चौकशी केली जावी आणि तहसीलदार, मंडळाधिकारी यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला जावा यासाठी अधीर अंधारेंसह अनेक महिलांनी उपोषण सुरु केले आहे. परमेश्वर जोंधळे, भगवान लंगोटे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु ठेवले आहे त्याशिवाय वंदना बबन पुढे यांनीही आपल्याला झालेली शिवीगाळी व मारहाणीची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केले जावेत यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचे समजते. एकूणच काय तर या सर्व प्रकरणावरुन परभणीत कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे काढले जात आहेत की काय, जणू अशीच परिस्थिती या सर्व बाधित प्रकरणांतून पुढे येणे स्वाभाविक आहे. महापालिका, पोलीस, महसूल आणि जिल्हाधिकारी यांच्या समन्वयातून ही सर्व प्रकरणे हाताळली गेली तर उपोषणकर्त्यांना न्याय दाना बरोबरच जाणीवपूर्वक कायदा हातात घेऊन अन्याय करणा-यांविरोधात कायद्याचा बडगा उगारणेही सोपे होऊ शकेल असे वाटते. प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून उपोषण करण्याचा न्याय दिला तर निश्चितच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या आनंद वाटला जाईल एवढे नक्की !
दरम्यान मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषण कर्त्या महिला व पुरुषांसाठी प्रशासनाने स्वच्छता गृह व शौचालयाची कोणतीही व्यवस्था केली नसल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, यांची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यातही त्याचा वापर करणे सोईचे होऊ शकेल.