दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक -दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी जिल्ह्यात असंख्य अशी देवी-देवतांची मंदीरे, श्रद्धास्थाने आहेत. तेहतीस कोटी देवांच्या चरणी नतमस्तक होणारा व भक्तीभावाने तल्लीन होणारा हा हिंदू भक्त भावाचा भूकेला म्हणून ओळखला जातो. संतांची भूमी म्हणून ओळखले जाणारे मराठवाडा क्षेत्र. त्यातही प्रामुख्याने परभणी जिल्हा विविध देवी, देव आणि देवालये यासाठी शीर्षस्थानी आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. नामांकित व पवित्र अशी तीर्थस्थानं सुध्दा या जिल्ह्यात बर्याच ठिकाणी असल्याचं बोललं जातंय. या व अशा नामांकित देवालये व देवस्थानांपैकी भोगाव येथील श्री मारुतीचे मंदीर सुध्दा असेच प्रसिद्ध असून तेथेही हजारो भाविक भक्तांची सदैव रिघ लागलेली असते.
अगोदरचा गंगाखेड तर नव्याने झालेला पालम तालुका या महसूली क्षेत्रात हे भोगाव आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसले असल्याने अगोदरच या गावाला पवित्र स्थान मानले जाते. गळ्यात लहान मोठ्या तुळशीमाळा घालून पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईला भजणारे लोकं येथे मोठ्या संख्येने राहातात. कांहीं जण तिरुपती बालाजीला दर्शनासाठी वर्षाकाठी जात असतात. कधी कधी तुरळक म्हणजेच बोटावर मोजता येतील असे भक्त वेढ्यालाही जातात. परंतु हे सर्व करीत असताना भोगावच्या या श्रध्दास्थानाला मात्र मुळीच विसरत नाहीत. वर्षाचे बाराही महिने येथील या श्रध्दास्थानाला बाहेरगावचे भक्तगण येत असतात. परभणी,नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतून सुध्दा असंख्य भक्त दर्शनासाठी येत असतात. फक्त दर्शनासाठीच नव्हे तर श्रद्धेपोटी केलेल्या नवसाची परतफेड करायला ते येत असतात. मराठवाड्यातील जे जे भक्त या मारुतीरायांना मानतात, भजतात, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक व परिचयाचे लोकही येथे दर्शन व नवस फेडायला येत असतात. नवस फेडणे म्हणजे आपलं एखादं काम होत नसेल, काही अडचणी येत असतील, कोणाच्या शेतीमध्ये विहिर खोदायचे प्रयोजन असेल किंवा खूप प्रयत्न करुनही त्या विहिरीला पाणीच लागत नसेल तर याच मारुतीरायांना नवस बोलला जातो. आमचं काम झालं तर आम्हाला जे घडू शकेल, जशी ऐपत असेल तसे नगर भोजन देईन, असे गा-हाणे घातले जाते. पण ते कोणालाही न सांगता घरच्या घरी किंवा मनातच बोलले जाते. त्यालाच भंडारा असेही संबोधले जाते. बोलल्याप्रमाणे काम फत्ते झालेले भक्त आपला तो कथित नवस फेडण्यासाठी जेव्हा देवस्थान व्यवस्थापन कमिटीकडे नांव नोंदणीची तारीख मागायला जातात, तेव्हा मात्र त्यांना सहा महिने किंवा वर्षे ह्यानंतर ची मिळत असते. यावरुन अंदाज येईल की, भक्तांची वेटींग लिस्ट किती संख्येने वाढलेली असते.
फार वर्षांपूर्वी असाच नवस फेडणे किंवा नगर भोजन देण्यासाठीची तारीख महिनाभराच्या अंतराने मिळत असे. परंतु त्याकाळी आठ दिवसांनी म्हणजेच फक्त शनिवारी असणारा हा कार्यक्रम (तो आता सोहळा झाला आहे) आता वर्षांतील बाराही महिने सतत सुरुच असतो.
शासनाने दूर्लक्ष न करता या जागृत देवस्थानाची महती, सत्यता आणि वास्तव प्रत्यक्ष जाणून घेतले तर आणि तरच शासन, प्रशासनाच्या ध्यानी येऊ शकेल. किंबहुना त्यानंतरच आर्थिक मदत केली जावी अशा निर्णयाप्रत शासनाचे धोरण ठरले जाईल असा विश्वास आहे.
कांहीं तांत्रिक अडचणी आल्याच तर मात्र हा सोहळा खंडित होतो अन्यथा नाही. दुसऱ्या दिवशीच्या नगर भोजनाची तयारी व सुरुवात आदल्या दिवशी रात्रीपासूनच करावी लागते. भल्या पहाटेपासून मारुती रायांना अभिषेक, त्यानंतर ज्यांचा सोहळा असतो, त्यांच्या वतीने आप्तेष्टांना कपड्यांचे आहेर चढवणे, मान, सन्मान आदी सोपस्कार (जसे लग्नावेळी असतात तसेच) पार पाडले जातात. त्यावेळी आपल्या सोयीनुसार आपण स्वतःच वाजंत्री वगैरे आणले जाते. त्यानंतर साधारणपणे एक वाजता नगर भोजनाला झालेली सुरुवात ५-६ वाजेपर्यंत चालते. हजारो भाविक पुरुष, तरुण व लहान मुले भक्त अगोदर आणि नंतर महिला या भोजनाचा आस्वाद घेतात.
आलेली भक्त मंडळी श्री मारुती राया, श्री विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन घेतल्यानंतर यथाशक्ती दान धर्म करीत असतात. समारंभाचा हा डोलारा बघून व मारुती राज्यांच्या प्रति असलेली भक्ती ध्यानी घेऊन स्वतःच्या मनानेच मोठ्या आकड्यांतील वर्गणी दान करुन रितसर दान केल्याची पावती मंदीर व्यवस्थापन कमिटी प्रत्येकाला देत असते. एका बाजूला अभिषेक तर दुस-या बाजूला समस्त भाविक भक्तांसाठी सुप्रसिद्ध अशा प्रवचनकार किंवा कीर्तनकारांच्या सत्संगाचा लाभ मिळावा, अशी योजना आखली जाते. प्रारंभी देव दर्शन, त्यानंतर हे.भ.पं.च्या सुश्राव्य कीर्तनाचा कानी लाभ आणि त्यानंतर सुग्रास, स्वादिष्ट भोजनाचा क्लाभ या पवित्र स्थळी मिळण्याचे भाग्य येथे येणाऱ्या प्रत्येकाला मिळत असते. “ज्यांच्या मनी भाव त्यालाच देव पावत असतो” अशी आख्यायिका
पूर्वापार चालत आलेली आहे जणू अशीच भावना प्रत्येकाच्या ठायी ठायी असते. मुल जन्मले की, चला दर्शनाला, लग्न झाले की, नवरदेव-नवरीला न्या दर्शनाला, काही पण नवीन काम फत्ते झालं की, चला दर्शनाला या व अशा प्रत्येक बाबींसाठी हे देवालय, दैवत एक श्रध्दास्थान ठरले जाते. किंबहुना त्याच भावनेने राजकीय मान्यवरांची सुध्दा वर्दळ येथे मागील काही वर्षांपासून कमालीची वाढीस लागली आहे. मग त्यामध्ये राजकीय कार्यकर्ते असोत वा पदाधिकारी, अगदी सरपंचांपासून ते आमदार -खासदारांपर्यंच्या असंख्य मान्यवरांनी आतापर्यंत या दैवताला, देवालयाला अनेकदा भेटी दिल्या आहेत, दर्शन घेतले आहे, मोठमोठ्या देणग्या अगदी कित्येक लाखांतील रकमेच्या देणग्या देऊन त्यांनी मदतीचे औदार्य दाखवत मंदीर व परिसराच्या विकासाला चालना देण्याचे भावनिक कार्य त्या सर्वांनी केले आहे. एवढेच नाही तर त्यावेळेपासून ते आजतागायत त्या सर्वच मान्यवरांचे हे दैवत श्रध्दास्थान बनले आहे.
कधीकाळी शंभर दोनशेच्या संख्येने येथे येणारा भाविक भक्त आज मितीला कित्येक हजारांच्या संख्येत पोहोचला आहे. इतकेच नाही तर शनी अमावास्येला तर ती संख्या लाखांपर्यंत ही गेल्यास नवल वाटू नये. हा सारा खटाटोप एवढ्यासाठीच निदर्शनास आणून देणे गरजेचे वाटते की, जर अंधश्रध्दा असती तर शेकडोंच्या संख्येतील भाविक भक्त लाखापर्यंत पोहोचलाच नसता. ज्या कोणाला मनाजोगा अनुभव आला असेल, ज्यांचे मनोरथ पूर्णत्वास गेले असेल, ज्यांच्या इच्छा आकांक्षा कृतीत उतरल्या असतील, ज्यांची सिध्दी फळाला आली असेल ते आणि तेच या श्रध्दास्थानाला अगदी मनोभावे न चुकता येतात. त्यांना कोणालाही जोर-जबरदस्ती किंवा धाकटदपशा करायची कधी गरज पडली नाही. मनोभावे, श्रध्देने येथे येणारा प्रत्येक भाविक भक्त केवळ आपणच नाही तर असंख्य जणांना या श्रध्दास्थानाचे महत्व आमच्यासाठी किती अनमोल आहे हे विषद करुन सांगतात, त्यानंतरच किंवा त्या कोणाला जेव्हा अनुभुती आली असेल किंवा महत्व पटले असेल तेव्हाच येतात एवढे मात्र खरे. तसं नसतं तर एवढी मोठ्या संख्येतही राजकीय मंडळी येथे आलीच नसती. ज्या ज्या आमदार, खासदारांनी स्वेच्छेने या दैवताला कित्येक लाखांच्या आकड्यांतील मदतीचे औदार्य दाखवले, ते कोणाच्याही सांगण्यावरुन नक्कीच नव्हते. ज्यांनी देणग्या दिल्या आहेत, त्यांना रितसर पावत्या देऊन त्यांची नावे सुध्दा जाहिरपणे फलकावर मंदीर परिसरात लावली आहेत.
गोर, गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूरदार, सर्वसामान्य नागरिकांनपासून ते धनदांडग्या सावकारांपर्यंत, कामगारांनपासून ते मालकापर्यंत, सरपंचांनपासून ते आमदार, खासदारांपर्यंत ज्यांनी ज्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे, त्या सर्वांच्याच सहकार्यांने देव, देऊळ, देवालये आणि मंदीर परिसराचा जो काही विकास होतो आहे, तो केवळ आणि केवळ भाविक भक्तांच्याच देणग्यांमुळे होत आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. वर्षांतील ३६५ दिवस (कांहीं अपवाद वगळता) मोठ्या प्रमाणात चालणारा हा सिलसिला वर्ष वर्ष अगोदर तारखा बुक करुन पार पाडावा लागतो आहे. आठवड्यातील इत्तर दिवसांपेक्षा शनिवारी खूपच गर्दी असते. त्याहीपेक्षा अधिक गर्दी उसळणारी संख्या शनी अमावस्येला असते. त्यामुळे ह्या श्रध्दास्थानाचे धार्मिक महत्व आणि
श्रध्दा दिवसेंदिवस अधिकच सर्वदूर पसरली जाते स्वाभाविक आहे.
शासन धोरणानुसार राज्यात जेथे जेथे प्रसिद्ध व नामांकित देवालये, मंदीरे, श्रध्दास्थाने कार्यरत आहेत, त्या सर्वांचा सर्वांगीण विकास शासनातर्फे प्राधान्य क्रमाने केला जाईल, असे सांगितले जाते आहे. त्या अनुषंगाने भोगाव ग्राम या पवित्र ठिकाणी असलेल्या या जागृत देवस्थानाची महती आमदार, खासदारांच्या सहकार्याने व पुढाकाराने शासनापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. या देवस्थानाची सत्यता व वास्तव शासन, प्रशासनाला पटवून सांगता यावे, यासाठीचा प्रोजेक्ट रिपोर्ट जर कोणा एखाद्या जाणकारांकडून योग्य त्या नियमांत बनवला गेला आणि तो नमूद लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने पोहोचवला गेला तर नक्कीच देवस्थानच्या विकासासाठी मनाजोगी आर्थिक मदत मिळवणे शक्य होईल असे वाटले तर चुकीचे ठरु नये.