दैनिक चालू वार्ता परभणी जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/कंधार : मन्याड खो-याचा ढाण्या वाघ तथा स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, आमदार डॉ. भाई केशवराव जी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा गौरव करण्याचा मुहूर्त अखेर शासनाला सापडला असून तो आगामी २४ ऑगष्ट २०२२ रोजीचा ठरला आहे. पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधून विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सार्वभौम सभागृहात भाई धोंडगे यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव शासनाच्या वतीने होणार असल्याचा अधिकृत खलिफा विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी धाडला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
मन्याड खो-याचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांनी ख्याती मिळवली आहे, त्या मर्द गड्याने आपल्याला ज्यांनी निवडून दिले त्या मतदारांच्या समस्या, मतदार संघातील समस्या सभागृहात मांडतांना कधीही आणि कशाचीही पर्वा केली नाही. अभ्यासू वृत्तीने मुद्दे मांडतांना बिनधोकपणे ते सभागृहात मांडून झोपेचं सोंग घेणा-या शासनाला सतत नियमावलीचे ठोके (धक्के) देण्याचे काम त्यांनी केले. गरीब, वंचित, कष्टकरी, शेतकरी अन् त्यांचा रांगडा, निधड्या छातीचा पोशिंदा आमदार, खासदार म्हणून त्यांनी जी परंपरा कायम राखली आहे, ती निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. मन्याड खो-यातील हे बहाद्दर पैलवान भाषण करतांना अगदी मांड्या (शड्डू) ठोकून अवघे सभागृह डोक्यावर घेत होते. ज्येष्ठ सदस्य म्हणून मानाच्या स्थानी असलेले केशवराव धोंडगे संपूर्ण सभागृच दणाणून सोडत होते. मग ते मुंबईत असोत वा दिल्लीत. अवघ्या सभागृहाला त्यांच्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दिसून येत असे. एरव्ही रिकामे दिसणारे सभागृह केशवराव धोंडगे यांचे आज भाषण होणार आहे असे कळताच ते तुडूंब भरले जायचे. विषय गंभीर व चिंताजनक असेल तर शासनाला अगदी ते धारेवर धरायचे, प्रसंगी सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल असे मुद्दे मांडून त्यांनी मतदार, शेतकरी, कष्टकरी विशेषत: गुराख्यांच्या प्रश्नासाठी पोटतिडकीने विषय मांडताना वातावरण कित्येकदा चिघळले जायचे. एकदा तर त्यांनी चक्क खुर्च्यांचीच तोडफोड करुन सभागृहातील वातावरण तणावपूर्ण करुन टाकले होते. त्यावेळी त्यांच्या पायालाही जबरी दुखापत झाली होती. बॅ. शेषराव वानखेडे हे सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असल्यामुळे त्यांनी स्वतः केशवरावजींच्या हाताला धरुन आधार देण्याचे सामाजिक औदार्य दाखविल्याचे ज्ञात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली जावी म्हणून संपूर्ण आठवडाभर सभागृहात वातावरण तप्त झाले होते. दोन दिवस अगोदर मला आमदार निवासात रात्रीचे बोलावून घेऊन त्यांनी शिवसेना आणि शिवसेना प्रमुख यांच्याविषयी जी माहिती आवश्यक होती ती संकलित केली. त्या माहितीच्या आधारे आणि आपल्या अभ्यासू वृत्तीने केशवराव धोंडगे यांनी दुस-या दिवशी सभागृहात असे मुद्देसूद भाषण ठोकले नि अटक करण्याच्या निर्णयाप्रत आलेल्या शासनाची पूरती पाचावर धारण बसवण्याचे महत्प्रयासी काम केले. अन्य लोकांचा सभागृहाशी काडीमात्र संबंध नसतांना त्यांना सन्मानाने प्रवेश देऊन त्यांचे कौतुक केले जाते तर मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभागृहाचे कोणते घोडे मारले आहे, असा संतप्त सवाल तत्कालीन शासनाला विचारला होता. संपाचे वेळी किंवा आंदोलन समयी ज्यांच्या एका इशा-यावर संपूर्ण रेल्वे बंद होऊ शकते हे विषद करताना केशवराव यांनी शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी केलेले जहाल कार्य ध्यानी घेण्याची खरी गरज असल्याचे महत्व पटवून दिले. त्यांना शासनाने अटक करण्याचा वेडेपणा जर खरोखरच केला तर मात्र अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल असा निर्वाणीचा इशाराच दिला. तेव्हा कुठे तप्त वातावरण थंड झाले नि बाळासाहेबांची अटक टळली गेली अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता पण तो केशवराजींच्या कुशलतेने टळला गेला हे भाग्यच म्हणायचे.
त्यानंतर अंदाजे एक दोन दिवसांनी शिवसेनेतर्फे केशवरावजींचा एका बड्या हॉटेलात सत्कारही केला गेला तो भाग वेगळा परंतु पक्ष कोणताही असो, त्यांनी पक्षभेद न करता बाळासाहेबांच्या मांडलेले मुद्दे सच्चोटीनेच मांडले हा विषय त्याहीपेक्षा महत्वाचा आहे.
केशवराव धोंडगे यांनी आपली उभी हयात गोर-गरीब, वंचित, गुराखी, कष्टकरी, शेतकरी आणि तळा गाळातल्या लोकांसाठीच घालविली, शेत मजूरांसाठी घालवली. गर्भ श्रीमंतांची लाचारी न पत्करता गोर-गरीबच माझा मायबाप असल्याची भूमिका कायम ठेवली. सभागृहात कोणताही विषय पोटतिडकीने मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले परंतु विरोधी पक्षांचा शिक्का असल्याने त्यांना यश मिळवण्यासाठी सतत कायदेशीर लढाईच करावी लागली. महत्प्रयासाने का होईना परंतु हाती घेतलेले कोणतेही जनताभिमुख काम यशस्वी करून घेण्यावर त्यांनी प्रसंगी अनेक लढे दिले, तीव्र आंदोलने उभारली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, हे कोणीच नाकारु शकणार नाही.
सुमारे ३८ वर्षे आमदारकी आणि तीन वर्षे खासदारकीचा काळ त्यांनी इमाने इतबारे जनकल्यानासाठीच घालवला हे वास्तव आहे.
तारांकीत प्रश्न, स्थगन प्रस्ताव, आयत्या वेळी येणारे विषय जीव तोडून मांडतांना प्रसंगी मन्याड खो-यातला बुलंद आवाज कसा असतो हे दाखवून देण्याचे धैर्यही त्यांनी दाखविल्याचे सर्वश्रुत आहे. नव्हे नव्हे तो संपूर्ण लोकप्रतिनिधीत्वाचा काळ अवघ्या महाराष्ट्रानेच नाही तर देशानेही पाहिला आहे.
उच्च विद्या विभूषित व्यक्तीमत्व, कणखर बाणा नि अभ्यासू व परखड वक्तृत्व, दिलदारपणा कायमचा मनी परंतु अरे बोलणा-याला का रे ची कठोर वाणी वापरायलाही ते कधी मागे पुढे बघितले नाही. बंधुत्व, ममत्व अशी गोर गरिबांसाठी वापरली जाणारी भाषा अडेल तट्टू प्रशासकीय अधिका-यांना वठणीवर आणण्यासाठी मात्र कायद्याचा आधार घेत ते न हिचकता कठोरत्व अंमलात आणायचे. शासनाशी दोन हात करतांना किंवा देश हिताचे काम करतांना प्रसंगी त्यांना गजाआडही जावे लागले. याची यत्किंचितही पर्वा त्यांनी कधी केली नाही किंवा त्या बाळगली नाही. Simple living, high thinking या इंग्रजी प्रणालीप्रमाणे उठ सुठ नगण्य गोष्टींसाठी कॉलर टाईट करुन फिरणा-यांना “साधी रहाणी, उच्च श्रेणी” च्या कृत्यातून निर्देशीत करत केशवरावांनी लोकसेवा करतांना आयुष्याची शंभरी कधी पार केली हे कळले सुध्दा नाही.
या व अशा नानाविध सामाजिक कार्याबरोबरच अवगत संसदीय प्रणालीचा गाढा अभ्यास, विधायकी मधील अनुभवाच्या शिदोरी चे गाठोडे स्वतःसाठी न वापरता त्यांनी नेहमी दुस-यांसाठीच उपयोगात आणले. सामाजिक चळवळींची आयुध्ये कुठे आणि कशी वापरायची याची त्यांना परिपूर्ण जाण आहे. मागील वर्षभरापासून मनाला चटका लावून बसलेली गोष्ट म्हणजे गोर-गरीबांचा कैवारी, दीन-दलित नि पददलितांचा व कष्टक-यांचा महामेरु, मन्याड खो-याचा ढाण्या वाघ, मतदारांचा बुलंद आवाज या व अशा नानाविध उपाध्यांनी विभुषित केशवराव धोंडगे यांच्या रुपाने जरी पटक्यात शोभून दिसणारे परखड नि जहाल व्यक्तिमत्व सर्वसामान्यांचे आधारु केशवराव वयाची शंभरी पार केल्यानंतरही मान -सन्मानाशिवाय उपेक्षितच राहतील की काय जणू अशीच शंका मनात गटांगळ्या खात होती, नको नको त्या शंका कुशंकांनी हेलकावे खात होती परंतु तसे काहीही न होता राज्यात झालेल्या सत्तांतरातील सरकारद्वारा नुकताच एक आशावादी खलिफा पाठवून डॉ. केशवराव धोंडगे यांच्या कामांचे मूल्यमापन करण्यात ते सार्थकी ठरल्याचे दिसून आले. त्यांत त्यांनी असे नमूद केले की, “आयुष्याची शताब्दी पार केल्यामुळे आगामी २४ ऑगस्ट २०२२ रोजी आपला दोन्ही सभागृहांच्या वतीने जाहीर सत्कार केला जाणार आहे, त्या सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय असून जरुर जरुर यावे” असा आग्रहाचा व विनंती पूर्वक मजकूर लिहिलेला खलिफा शासनातर्फे मौजे बहाद्दर पुरा, कंधार मुक्कामी प्राप्त झाल्याचे विश्वसनीय समजले. उशीरा का होईना परंतु शासनाने धोरणात्मक व मानवीय कर्तृत्वाचे मूल्यमापन जपणारा जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. महाराष्ट्र शासनाचे, सुज्ञ प्रशासनाचे आणि त्यांना या कामी पडद्यामागून का होईना परंतु सूचना व मौलिक सल्ला देण्याचे विधायक काम केले, त्या सर्वांचे आभार मानून त्यांना शतशः प्रणाम करणे हे मी समस्त मराठवाडा वासियांच्या वतीने अहो भाग्यच समजतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!