दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना एका वर्षभरात प्रत्येक चार महिन्यांनी मिळणारा २०००/- रुपयाचा हप्ता आता ई-केवायसी केल्याशिवाय मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला ६०००/- रुपये शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.मात्र आता हा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर पर्यंत आपली ई-केवायसी केली नाही तर पुढच्या अनुदानास ते शेतकरी अपात्र ठरतील असे सांगण्यात आले आहे.
या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीत अधिक पारदर्शकता यावी म्हणून शेतकऱ्यांना आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील आपले सरकार केंद्र,सेतू सुविधा केंद्र आदी ठिकाणी जाऊन आपली ई-केवायसी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अपडेट करून घेणे बंधनकारक आहे.ई-केवायसी अपडेट करण्यासाठी शेतकऱ्याचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे.ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे अश्या शेतकऱ्यांची यादी गावातील तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांकडे उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने देऊन ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही अश्या शेतकऱ्यांनी ती अपडेट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.