दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-
परभणी : पावसाअभावी वाळून चाललेल्या पिकांना दिलासा मिळावा म्हणून आगामी दोन दिवसांत लोअर दूधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. आ. राहूल पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे. मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेली आहेत. परिणामी समस्त शेतकरी वर्ग पूरता मेटाकुटीला आला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी लोअर दूधना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्री. गवळी यांची भेट घेऊन इत्यंभूत परिस्थिती कथन करत पाणी सोडण्याची मागणी केली.
आ. पाटील याची विनंती आणि वरुणराजाने फिरवलेली पाठ या दोन्ही बाबी लक्षात घेऊन अधीक्षक अभियंता श्री. गवळी यांनी आगामी दोन दिवसांत धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांना कळवले.
लोअर दूधना प्रकल्पातून नदीपात्रात सोडलं जाणाऱ्या संभाव्य पाण्यामुळे समस्त शेतकरी वर्गाला पूरता दिलासा मिळणार आहे. पावसाची उणीव परिणामी पिकांवर पडणारा त्राण कमालीचा त्रासदायक असल्याने लवकरात लवकर पाणी सोडले जावे यासाठी झरी, सनपूर, देवठाणा, मठ क-हाळा, करडगांव, समसापूर आणि मांगनगाव आदी ग्राम पंचायतींनी सुध्दा तशा प्रकारचे ठराव लेखी स्वरूपात प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता श्री. गवळी यांना दिले होते. एकूणच लवकरच सोडले जाणाऱ्या धरणातील या पाण्यामुळे वाळली जाणारी पिके वाचली जातील असा विश्वास शेतकऱ्यांना वाटणे स्वाभाविक आहे.