दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी हजारो नाभिक बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे केली आहे.
सेलू येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर ज्या दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केले आहेत, ते कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नाभिक महामंडळाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे केली आहे.
सेलू येथील हजारो नाभिक बंधू-भगिनी आज गुरुवार, दि. ८ सप्टेंबर २२ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. उपोषण मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यानच्या आंदोलनात हजारो संतप्त नाभिक बांधवांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी नाभिक महामंडळातील संतप्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे ही मागणी केली.
या आंदोलनामुळे सेलू तालुक्यासह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा तो आंदोलनात्मक पवित्रा खदखदणारा असाच होता.
भूरट्या चोऱ्या, घरफोड्या, दुकाने फोडून सामान्यांची व आर्थिक लूट, मंदीरातील किमती ऐवजांसह आर्थिक लूट, जबरी चोऱ्या, जबरी मारामाऱ्या, खूनाचे प्रयत्न वा खूनाच्या घटनांमध्ये झालेली वाढ, गुटखा तस्करीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ, अल्पवयीन असो वा मोठ्या मुलींचे तथा महिलांचे वाढते अपहरण, अत्याचार, बलात्काराचे प्रयत्न वा बलात्काराच्या वाढणाऱ्या घटना, बाईक असोत किंवा चार चाकी वाहनांच्या चोरीचे वाढते
प्रकार, परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसेंदिवस अधिकच वाढीस लागले आहेत. परिणामी कायदा व सुव्यवस्था ढासळली गेल्यास चुकीचे ठरु नये. गुन्हे व गुन्हेगारी यांचा रेषो अधिकच वाढला जातो आहे. खाकी वर्दीचा जो वचक असायला हवा, तसा तो असल्याचे दिसून येत नसावा, म्हणून की काय जिल्ह्यात सर्वत्र कायदा व नियमांची ऐंशी की तैशी होतांना दिसत आहे. परिणामी पोलीस दलाची बदनामी का खच्चीकरण हे मात्र अधिकच होतांना दिसत आहे. गुन्हेगार व गुन्हेगारीवर खाकी वर्दीचा अंकुश कुठे तरी ढिला झाल्याची पार चुकचुकत आहे. त्याचाच परिपाक म्हणून जिल्हाभरात कुठे ना कुठे भयानक अशा घटना घडत आहेत. हे अशोभनीय असेच म्हणावे लागेल.
वाढते नागरीकरण, त्या तुलनेने आवश्यक असे पोलीस बळ नसल्यामुळेच गुन्हेगार व गुन्हेगारी वाढीस लागली आहे. परिणामी सर्वसामान्य माणूस आणि सधन व्यापारी वर्ग सुध्दा असुरक्षित होत आहे. प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून वावरताना आढळून येत आहे. सुरक्षेची हमी कोणालाही नाहीय.
शासन, प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकारणी मंडळींना याप्रकरणी सखोल विचार करावा लागणार आहे. गुन्हेगार व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करावे लागणार आहे. त्यासाठी एकमुखी मागणी करुन शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पोलीस बळ अधिक प्रमाणात वाढवून घ्यावे लागणार आहे. पोलीस ठाण्यांबरोबरच चौक्यांचीही अधिक निर्मिती करावी लागणार आहे. गस्ती पथके तैनात करुन ती अधिक प्रमाणात वाढवावी लागणार आहेत. वाटल्यास नागरिकांचीही मदत गस्तीपथकासाठी जरुरी आहे. पोलीस दल बदनाम होऊ नये, म्हणूनच आमचा हा मनस्वी प्रयत्न आहे.
याप्रकरणी सेलू येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ज्यामध्ये शाळा, आस्थापने, खासगी कार्यालये आदींचा समावेश होता.