दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे कारेगाव मधील शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके करपून गेली आहेत. परिणामी अगोदरच बियाणे, खते, औषधी व फवारणीसाठी कर्जबाजारी झालेला समस्त शेतकरी वर्ग पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. आर्थिक नियोजन डबघाईस आल्यामुळे शेतकऱ्यांवर गंभीर परिस्थिती ओढावली आहे. जिल्हाभरात सर्वत्र पिक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम जोमाने सुरु आहे परंतु परभणी शहरालगतच्या कारेगावचे शेतकरी मात्र अद्यापही या सर्वेक्षणापासून वंचित राहिले आहेत. तरी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कारेगावच्या शेतकरी समस्या आणि पिक नुकसानीचे सर्वेक्षण या विषयी तातडीने लक्ष घालावे अशी विनंती शेकडो शेतकऱ्यांनी एका अर्जाद्वारे केली आहे.
केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त समन्वयातून स्थापित एका विशेष कमिटी द्वारे हे सर्वेक्षणाचे काम विविध गटांच्या मदतीने सुरु आहे. परंतु परभणी शहरालगत असलेले कारेगावचे शेकडो शेतकरी मात्र अद्यापही या योजनेपासून वंचित राहिले आहेत. सोयाबीन व अन्य पिंकाचे पावसाअभावी झालेले कमालीचे नुकसान शासनस्तरावर अद्याप कोणीच कसे ध्यानात घेतले नाही, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल या कर्मठ व कर्तबगार आहेत. त्यांना शेतकऱ्यांची कणव आहे. कर्तव्यात कोणाकडूनही कसूर होणार नाही, यांची त्या पुरेपूर काळजी घेणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांचा बोलबाला आहे. पावसाअभावी करपून गेलेली पिके बघून शेतकऱ्यांची अवस्था किती बिकट झाली असेल त्यांचीही यांना पूर्ण जाणीव आहे. कारेगावच्या समस्त शेतकरी वर्गाला जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कडून भरीव आशा आहे. त्यांचे व परिवाराचे जीवन उध्वस्त होऊ नये असे वाटत असेल आणि त्यांना जीवनदान असे खरोखरच वाटत असेल तर गोयल मॅडम यांनी तातडीने लक्ष घालून कारेगावच्या शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करावे अशी आर्त हाक ही त्यांनी दिली आहे.