दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या लहरी मित्र मंडळ व जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देत या मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.बऱ्याच वर्षांपासून लहरी मित्र मंडळ व जय हनुमान गणेशोत्सव मंडळाचे सामाजिक कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
सुर्जीमधील द्वारका चौक येथील लहरी मित्र मंडळ व जय हनुमान गणेशोत्सव मंडळाची स्थापना पुरातन असून शहरातील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक असे हे नावाजलेले मंडळ आहे.सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच आरोग्य निदान शिबिर,रक्तदान शिबीर,चित्रकला स्पर्धा,सामान्य ज्ञान स्पर्धा अश्या विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास या मंडळाच्या वतीने प्राधान्य दिले जाते.तर कोरोना महामारीमुळे लॉकडाउनच्या काळात हजारो बेघर व गरजू लोकांना या मंडळातर्फे अन्नदान तसेच जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लहरी मित्र मंडळ व जय हनुमान गणेशोत्सव मंडळ आयोजित केलेल्या भव्य रोगनिदान शिबिराला तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सुमारे ३०० नागरिकांनी लाभ घेतला तर कु.सिद्धी प्रवीण पटूकले व कु.साक्षी सुनील येवोकार यांनी आयोजित केलेल्या रंगभरण चित्रकला स्पर्धेला ९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये सहभाग घेतलेल्या प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला सौ.सविता ढोले व श्री.अमितजी श्रीवास्तव निरीक्षक म्हणून लाभले होते.
लहरी मित्र मंडळ व जय हनुमान गणेशोत्सव मित्र मंडळ हे दरवर्षी महापुरुषांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करतात.त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यावर जास्त भर दिला जातो.यावर्षी देखील रोषणाईवर व सजावटीवर खर्च न करता मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.