दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावतीमधून बेपत्ता झालेल्या मुलीची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.या मुलीने आपण स्वतःहूनच घर सोडलं होतं,अशी प्रतिक्रिया दिली आहे.चार दिवसांनी या मुलीला गुरुवारी साताऱ्यातून अमरावतीत परत आणण्यात आलं.त्यानंतर या मुलीने आपण घर सोडून का गेलो,यावर स्पष्टीकरण दिलंय.या मुलीने प्रसारमाध्यमांना बोलतांना घर सोडून जाण्याचंही कारणंही सांगितलंय.
काय होती पहिली प्रतिक्रिया?
मी कोणासोबतही पळून गेले नव्हते,असं बेपत्ता मुलीने म्हटलंय.माझ्या बद्दल सुरु असलेली बदनामी थांबवा,अशी कळकळीची विनंतीदेखील तिने केली.मी घरुन माझ्या शिक्षणासाठी निघून गेले होते.फक्त माझी बदनामी केली गेली.पण मुळात तसं काहीच नाही,असंही तिने म्हटलंय.मला फक्त कोर्स करायचा होता.बाकी काही नाही,असं या तरुणीने म्हटलंय.
साताऱ्यात कशी पोहोचली?
बेपत्ता झालेल्या या मुलीने बडनेरा ते भुसावळ असा प्रवास केला होता.त्यानंतर भुसावळहून या मुलीने दुसरी ट्रेन पकडली आणि ती पुण्यामार्गे साताऱ्याला गेली.विशेष म्हणजे हा सर्व प्रवास या तरुणीने विना तिकीट केला,अशीही माहिती मिळतेय.
बेपत्ता झालेली ही तरुणी बीएससीच्या अखेरच्या वर्षाची विद्यार्थीनी आहे. या मुलीला मेडिकलशी संबंधित एक कोर्स करायचा होता.पण हा कोर्स करायचा की नाही,यावरुन घरी चर्चा होती.त्याच्याच रागातून तिने घर सोडलं असल्याचीही माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
चार दिवसांनी ही बेपत्ता तरुणी साताऱ्यात आढळून आली.गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या बेपत्ता तरुणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं.स्थानिक खासदार नवनीत राणा यांनी सनसनाटी आरोप करत हा लव्ह जिहादचा प्रकार आहे,असा आरोप केला होता.अशाच प्रकारचा आरोप भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनीदेखील केला होता.