दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहराचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सर्व लहान-मोठे रस्ते नियमित स्वच्छ ठेवणे, गटारे व नाल्या यातील मैला नियमित काढून त्यातील घाणीच्या वा नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत सतत व्यवस्थित वाहता राहिला जाईल असे प्रयत्नशील राहाणे, ओला व सुका अशी कचऱ्याची विविधांगी करणे, वेळोवेळी व नियमित उचलला जाणे, घाण कुठेही साचून राहिली जाणार नाही, यांची दक्षता घेणे व नियमित कटाक्ष राखणे, कर्तव्यावरील कोणीही सफाई कर्मचारी असो वा निरिक्षक, तो वेळेतच कर्तव्यावर उपस्थित राहाणे, जाणीवपूर्वक उशीरा येणे किंवा त्याची पाठराखण करुन कसूर करणाऱ्याला साथ देणे किंवा झालेल्या चुकीवर चूक असल्याचे माहित असूनही पांघरुण घालणे, जाणिवपूर्वक कर्तव्यात कसूर करणे, शहराच्या स्वच्छतेला बाधा ठरु शकतील अशा कोणत्याही कसूर ठरतील अशा (गैर) बाबी उजागर झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा खणखणीत इशारा परभणी महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिला आहे. सफाई कर्मचारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या विशेष बैठकीत त्यांनी हा इशारा दिला आहे. अर्थात त्यांनी उचललेले हे पाऊल अत्यंत धाडशीपणाचे असले तरी ते अत्यंत आवश्यक असेच आहे.
शरीर कायम निरोगी राहिले जावे यासाठी आपण नियमित सकस आहार घेतो, वेळेच्या वेळी जेवतो, जेवणात विध पालेभाज्या, कडधान्य, फळे आदींचा उपयोग करतो, तब्येत थोडीशी जरी अशक्त बनली किंवा एखादा आजार झाला तर वेळीच औषधोपचार करतो, शरिराची नीट काळजी घेतो, आराम करतो किंबहुना शहराचे व स्वच्छतेचे तसेच अतुट नाते आहे. वेळेच्या वेळी योग्य अशी साफ सफाई व स्वच्छतेची काळजी नाही घेतली गेली तर शहराचे पर्यायाने शहरातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते, हे मुळीच नाकारता येणार नाही आणि म्हणूनच आयुक्तांना हा निर्णय घेणे भाग पडले जाणे स्वाभाविक आहे. अशा एकाच निर्णयावर न थांबता भविष्यातही अशी अनेक धाडशी पाऊले उचलावी लागणार आहेत. कर्मचारी मग तो कोणत्याही श्रेणीतला असो वा अधिकारी, कर्तव्यावर येण्याची वेळ ही सर्वांनाच बंधनकारक ठरली जाणे आवश्यक असते. वेळेच्या वेळी किंबहुना वेळेतच कोणत्याही कामाचा निपटारा होणे, आदेशाचे अनुपालन करणे, कर्तव्यात तत्परता असणे, शिस्तीचे पालन करणे, सोपवलेली जबाबदारी निष्ठेने कर्तव्यात कसूर होणार नाही, यांची दक्षता व कटाक्ष घेत पार पाडणे हे सेवेतील सर्वांचेच कर्तव्य असते. याचीही जाण सर्वांना राहिली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु बहुधा तसे होताना अनेकदा दिसून येत नाही. परिणामी इच्छा असूनही अनेक महत्त्वपूर्ण कामे तशीच अडगळीत पडलेली दिसून येतात. त्याचाच परिपाक म्हणून एकामुळे अनेकांना दोष दिला जातो. गव्हाबरोबर जसे किडे रगडले जातात तसेच अधिकारी सुध्दा भरडले जातात. पर्यायाने महापालिकाच बदनामीची शिकार बनली जाते. शिस्तीचे अनुपालन केले जावे यासाठी कायद्याचा व नियमांचा बडगा हा एक ना एक दिवस उचलावाच लागणार आहे.
सन १९७५ च्या कालखंडात शंकरराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळत असताना त्यांनाही असाच वाईट अनुभव दृष्टीपथास आला होता. सर्व काही मार्ग अंमलात आणून बघितले पण त्याचा कांहीच उपयोग होत नाही हे त्यांच्या पूरते ध्यानी आले होते. अखेर त्यांनाही तोच दंडुका उगारणे भाग पडले, ज्यामुळे सगळे आपोआप वठणीवर आले व शिस्तीचे अनुपालन आचरणात येत गेले.
बरोबर सकाळी साडे दहाच्या ठोक्याला मंत्रालयाची सर्व मुख्य दरवाजे बंद करण्याचे सक्त आदेश देण्यात आले ज्यामुळे लेट लतिफांचा झोपच उडाली गेली. उशीरा येणाऱ्यांची रांग इकडे आकाशवाणी केंद्रापर्यंत तर तिकडे समुद्र काठाकडील बस स्थानकापर्यंत आणि तिसरीकडे चक्क चर्चगेट स्टेशनच्या भूमीत मार्गापर्यंत. कोणालाही काहीच कळेनासे झाले होते. जेव्हा फतवा आला नि समजले की, आजपासून लेट येणाऱ्यांना आजचा दिवस खाडा (अब्सेंटी) पकडला जाणार आहे, अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल. अगदी सुतासारखे (ज्यांच्या अंगवळणी उशीरा येण्याची सवय लागली होती) ते सर्वच लेटलतिफ सुधारले गेले. सर्व कामे वेळेत व अनुपालनात पार पडली जात होती. तीच प्रणाली आयुक्त असलेल्या भा. गो. देशमुख यांनीही मुंबई महापालिकेत लागू करत त्यांनीही सकाळी साडे दहाच्या ठोक्याला महापालिकेच्या मुख्य दरवाजांची कवाडे आतून बंद करुन कायद्याचा बडगा काय असतो हे दाखवून देतात तेथेही सुधारणा झाली हे वास्तव आहे. परभणीत ही एक ना एक दिवस हे करावेच लागणार आहे. बेशिस्तीचा झालेला कहर मोडीत काढणे भाग पडू शकते. तर आणि तरच कामांचा वेळेत व मनाजोगा निपटारा होऊ शकेल. शिस्तीचे अनुपालन केले जाईल. कथित लेट लतिफांमुळे वेगळ्या नजरेने पाहिली जाणारी महापालिका शिस्तपूर्ण आदर्श मंदीर ठरले जाईल यात शंकाच नाही. मग स्वच्छता सप्ताह असो वा कामांचा निपटारा अगदी ठरलेल्या वेळेतच किंवा वेळेआधीच होऊ शकेल परंतु त्यासाठी कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणे आवश्यकच ठरणार आहे एवढे नक्की.