दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सिडनी / नवी दिल्ली : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत साखळीत अनुक्रमे ऑस्ट्रेलिया , न्यूझीलंड, भारत व श्रीलंका हे पहिले चार संघ ठरले. पहिल्या पात्रता सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर १०४ विरुद्ध ७६ असा २८ धावांनी पराभव केला व अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारतानेसुध्दा दुसर्या पात्रता सामन्यात श्रीलंकेवर १०९ विरुध्द ६९ असा ४० धावांनी विजय मिळवला. आता अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारताला न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल. भारतीय संघ प्रथमच पहिल्या तीन संघात पोहचला आहे. त्यामुळे भारतीय इनडोअर क्रिकेटमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दुसर्या पात्रता फेरीच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १०९ धावा केल्या व एक कडवे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले. मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली श्रीलंकेचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नाही. या सामन्यात विजय मिळवणे दोन्ही संघांना आवश्यक होते. त्यामुळेच भारतीय संघाने सुरुवातीपासूनच जिंकू किंवा मरू या थाटात खेळत विजयश्री खेचून आणली.
भारताच्या सलामवीरांनी १६ षटकांच्या सामन्यात आजही चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २५, ३९, २२ व २३ धावांची खेळी करताना एकूण १०९ धावा करत मजबूत स्थिति मिळवली. भारताच्या दुसर्या जोडीने जोरदार फटकेबाजी करत भारताला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली. तर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २४, ११, १४ व २० धावांवर रोखत जोरदार विजय साजरा केला. आजच्या सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंसमोर हारकिरी केल्याचे दिसले.
भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकात श्रीलंकेचे एकूण ८ फलंदाजांना बाद केल्याने श्रीलंकेच्या धावाफलकतून ४० धावा कमी करता आल्या तर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी १६ षटकात भारताचा एकाच फलंदाज बाद केल्याने भारताच्या धावाफलकतून फक्त ५ धावा कमी झाल्या (तिसर्या जोडीतील फक्त अरीस अजीजलाच बाद करता आले.) एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय चांगले झाले त्यामुळेच भारताला मोठा विजय प्राप्त करता आला.
भारता तर्फे पहिल्या जोडीने दैविक राय (१४) व धनुष भास्कर (११) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरवतींनंतर दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (२३) व अफरोज पाशा (१६), तिसऱ्या जोडीतील सुरज रेड्डी (१३) व अरिस अजीज (९) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नमशीद वयप्रथ (९) व मोहसिन नदाम्मल (१४) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.
श्रीलंकेच्या पहिल्या जोडीमधील शेवोन फोनसेंका (११) व ऍंडी सोलोमॉंस (१३), दुसऱ्या जोडीमधील चंडिमा ॲबेकून (६), कमाल कुरुप्पू (५),तिसऱ्या जोडीतील निलंथा वीजेकून (७) व रुमेश पेरेरा (७) तर शेवटच्या जोडीतील कोलिथा हापूयाराच्ची (६) व मलशान रॉड्रीगो (१४) यांनी कडवी लढत दिली.
भारताच्या धनुष भास्करने ३, सूरज रेड्डीने २, नमशीद वयप्रथ, दैविक राय व अरिस अजीज यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला तर श्रीलंकेचा मलशान रॉड्रीगोच एक फलंदाज बाद करू शकला.
या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार भरताच्या धनुष भास्कर देऊन गौरवण्यात आले.