दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : लोकप्रिय वेबसिरीज ‘मिर्झापूर’च्या पुढील भागांवर बंदी घालण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती.
गुरुवारी झालेल्या कोर्टाच्या सुनावणीत याचा निकाल लागला असून कोर्टाने दिलेल्या निकालामुळे या वेबसिरीजच्या निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. मिर्झापूरचा पहिला सिझन नोव्हेंबर 2018 मध्ये तर दुसरा सिझन नोव्हेंबर 2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकला होता. दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. इतकेच नव्हे तर प्रेक्षक तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणून लवकरच तिसरा सिझन प्रदर्शित करण्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु उत्तर प्रदेशातील मिर्जापूरमध्ये राहणाऱ्या सुजित कुमार सिंग यांनी या तिसऱ्या सीझनवर बंदी घालावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात सादर केली.
सुजितकुमार सिंग यांनी मिर्जापूर हे नाव वापरण्यावर आक्षेप घेतला होता. तसेच या वेबसिरीजमधील काही विषयांवर प्रश्न निर्माण केले होते. मुळातच या सीरिजला मिर्झापूर असे नाव दिल्यामुळे या शहराचा अपमान होतो असे त्यांचे म्हणणे होते. पौराणिकदृष्ट्या महत्व असलेल्या मिर्झापूरचा उल्लेख अनेक वेदांमध्ये आहे. अशा पवित्र स्थळी खून, मारामाऱ्या अश्या भडक गोष्टी दाखवणे गैर आहे. असे याचिकेत मांडण्यात आले होते. तसेच या याचिकेमध्ये त्यांनी ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ही वेब सीरिज आधी दाखवली जावी,अशी मागणी केली होती. त्यासाठी प्री स्क्रिनिंगसाठी कमिटीची स्थापना करावी असेही त्यात नमूद करण्यात आले होते. मुख्य न्यायाधीश उदय उमेश लळित आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.
सरन्यायाधीश लळीत यांनी म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती केवळ देशाव्यतिरिक्त परदेशातही प्रदर्शित होतात. त्यामुळे या बाबत अनेक प्रश्न आहेत, त्यावर विचार करण्याची गरज आहे. याचिकाकर्त्यानं दाखल केलेली याचिका योग्य नसल्याचंही सांगताना कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की, सिनेमॅटोग्राफर कायद्यांतर्गत अनेक कायदे आहेत. त्याअंतर्गंत ओटीटी ला आणायला पाहिजे का ?