दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – माधव गोटमवाड
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला .प्रकृती बिघडल्याने त्यांना 15 दिवसांपासून या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण शनिवारी, त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र शनिवारी प्रकृती बिघडली आणि त्यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं.
मृत्यूसमयी त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ होते. विक्रम गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी सह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी पुण्यात झाला होता. यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व माध्यमात काम केले होते. ते चित्रपटांबरोबरच रंगभूमीवर सुद्धा अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जायचे.
त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. विक्रम गोखले यांना अभिनयाचे धडे कुटुंबातच मिळाले होते. विक्रम गोखले यांच्या वडिलांपासून ते आजी आजोबापर्यंत संपूर्ण कुटुंबच चित्रपटसृष्टीत कार्यरत होत.
विक्रम गोखले यांच्या कुटुंबाचा मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीशी देखील दीर्घकाळ संबंध आहे. विक्रम गोखले यांच्या आजी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या भारतीय कलाकार होत्या. इतकेच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके दिग्दर्शित चित्रपटात त्यांच्या आजीने हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण केल्याचेही माहिती आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीही 70 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते. मराठी चित्रपटसृष्टीत ‘गोदावरी’ हा चित्रपट तर ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील गुरुंजींची भूमिका अखेरची ठरली आहे. विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
विक्रम गोखले यांची गाजलेली नाटकं
एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, के दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना आणि नकळत सारे घडले ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत.
विक्रम गोखले यांचे गाजलेले सिनेमे
‘मॅरेथॉन जिंदगी’ , ‘आघात’ हा त्यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट, ‘आधारस्तंभ’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘कळत नकळत’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘दरोडेखोर’, ‘दुसरी गोष्ट’ , ‘दे दणादण’, ‘नटसम्राट’, ‘भिंगरी’ , ‘महानंदा’ ,’ माहेरची साडी’ आणि ‘वासुदेव बळवंत फडके’ त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत
विक्रम गोखले यांना मिळालेले पुरस्कार
‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५), चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.