दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
———————————————————-
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.मारोती कसाब यांनी लिहिलेला हा लेख खास आमच्या वाचकांसाठी देत आहोत – संपादक
____________________________________
‘ काय करुं आता धरूनिया भीड।
नि:शंक हे तोंड वाजविले
नव्हे कोणी जगी मुकियाचा जाण ।
सार्थक लाजून नव्हे हीत ।। ‘
‘या बोलघेवड्या जगात मुक्यांचा कुणीही वाली नाही. त्यामुळे कुणाचीही भीडभाड न ठेवता, मुलाहिजा न बाळगता बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे, आपले दुःख जगाला सांगितले पाहिजे’ , असे अभिव्यक्तीचे महत्त्व रोखठोक शब्दांत संत तुकारामांनी सांगून ठेवले आहे. आजच्या या अघोषित आणीबाणीच्या काळात अभिव्यक्तीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले झाले आहे. आज या भांडवली जगात धर्म आणि जात हीच माणसाची ओळख बनलेली आहे. द्वेष, हिंसा, महागाई आणि कट्टरता वाढत असलेल्या या काळात सरकार आणि सरकार पुरस्कृत संस्थांकडून लेखकांवर, कवींवर, विचारवंतांवर आणि पत्रकारांवर दबाव आणला जात आहे. त्यामुळे अनेक लेखकांनी आपले लेखन थांबवले आहे. अनेक पत्रकारांनी पत्रकारिता सोडलेली आहे. रविश कुमार, निखिल वागळे यांच्या सारख्या पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर बंधने लादली जात आहेत. अशा अत्यंत कठीण काळात ज्यांनी आपली माणूसकी जिवंत ठेवत, सामाजिक बांधिलकीने आपली लेखणी सुरू ठेवली आहे, अशांपैकी एक म्हणजे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार हे एक होत.
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी दैनिक लोकमतच्या माध्यमातून पत्रकारितेला प्रारंभ केला. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच त्यांची ओळख पत्रकार म्हणून या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाली. ‘दैनिक लोकमत म्हणजे वसंत बिरादार आणि वसंत बिरादार म्हणजेच दैनिक लोकमत ‘ असे एक समीकरणच त्या काळात निर्माण झाले होते. लोहा परिसरातील लोकजीवन त्यांनी पत्रकारितेतून साक्षात केले. या परिसरातील लोक परंपरा, लोकधाटी, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य या गोष्टींना त्यांनी ‘लोकमत ‘ मधून प्रकाशात आणले. लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी हिवाळ्यात भरणाऱ्या खंडेरायाच्या जत्रेला त्यांनी प्रथमच प्रसिद्धीच्या मोठ्या पटलावर आणले. या जत्रेत दरवर्षी भरणाऱ्या विमुक्त भटक्यांच्या जातपंचायती, त्यांची भांडण- तंटे, न्याय निवाडे, या जत्रेतील विक्रीसाठी येणारे विविध पदार्थ यापासून ते मनोरंजनासाठी येणारी लोकनाट्य तमाशा मंडळे, जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केले जाणारे लावणी महोत्सव, लोककला महोत्सव अशा विविध गोष्टींना त्यांनी लोकमतच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. आजही माळेगावच्या जत्रेविषयी अभ्यास करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना डॉ. वसंत बिरादार यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रातील बातम्यांचा मोठा आधार वाटतो. दक्षिण भारतातील सर्वांत मोठी जत्रा म्हणून माळेगावच्या जत्रेला फोकस करण्यात प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. माळेगावच्या जत्रेबरोबरच कंधार तालुक्यातील गुराखी गडावर सातत्याने भरणाऱ्या भारतातील एकमेव अशा गुराखी साहित्य संमेलनाचे वार्तांकनही प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी लोक भावनेची कदर करत अतिशय बहारदारपणे केलेले आहे. कंधार तालुक्याचे माजी आमदार आणि नांदेडचे माजी खासदार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई केशवराव धोंडगे यांनी सुरू केलेल्या या गुराखी साहित्य संमेलनाचे सविस्तर वार्तांकन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी केले आहे. गुराखी गडावर भरणारा हा अभिनव साहित्य संमेलन सोहळा त्यांनी जगात सर्वदूर पोहोचविला. त्याशिवाय आपल्या धाडसी वृत्तीने त्यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अनेक मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणले आहे. तसेच लोकोपयोगी कामे करणाऱ्यांना गौरविले आहे.
जवळपास २५ वर्ष त्यांनी सातत्याने दैनिक लोकमत मधून लोकाभिमुख पत्रकारिता केली. पत्रकारिता हा त्यांचा स्थायी स्वभाव बनला आहे. त्यांच्यामध्ये एक उत्तम शिक्षक आहे. एक उत्तम लेखक समीक्षक म्हणून त्यांनी ख्याती मिळविलेली आहे. आज अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि आदर्श प्राचार्य म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरलेली आहे. एक उत्कृष्ट, शिस्तप्रिय प्रशासक म्हणून त्यांना ओळखले जाते. इ.स. २००९ पासून ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली अत्यंत अल्पावधीत महात्मा फुले महाविद्यालयाने चौफेर यश संपादन केले आहे. २०१६ पासून आजतागायत महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकत आहेत. याचे श्रेय विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सर्व प्राध्यापकांबरोबरच कुटुंब प्रमुख म्हणून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचेही आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासान केंद्र सुरू आहे. या केंद्राच्या वतीने दरवर्षी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेऊन अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अध्यासन केंद्राला दरवर्षी ग्रंथ भेट देऊन समृद्ध बनविले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परिसरातील जनतेला प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी ग्रंथ दान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाविद्यालयातील प्राध्यापक आणि परिसरातील सुजाण नागरिकांनी ७५०० ग्रंथ महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिली. याशिवाय त्यांच्याच नेतृत्वाखाली मराठी विभागाने गतवर्षी महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने उत्कृष्ट साहित्य पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील उत्कृष्ट लेखकांना गौरविण्यात आले. महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या नावांनी गार्डन विकसित केले आहे. याशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. प्राध्यापकांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही त्यांचे विशेष करून लक्ष असते. गुणवत्ता, शिस्त, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिकता अशा सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करूनही त्यांच्यातला पत्रकार अजून जिवंत आहे हे मला अधिक महत्त्वाचे वाटते.
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांची कर्तृत्व क्षमता अचाट आणि अफाट आहे. सातत्याने ललित लेखनाबरोबरच दैनिक रिपब्लिकन गार्ड आणि दैनिक वतनवाला यासारख्या विभागीय वृत्तपत्रांतून त्यांचे स्तंभ लेखन आणि वार्तापत्र लेखन सातत्याने सुरूच असते. विशेष म्हणजे त्यांच्या लेखणीला लोकलयीचा विलक्षण गोडवा लाभलेला आहे. मराठवाड्याच्या लोकभाषेची त्यांना उत्तम जाण आहे. आपल्या लेखनामध्ये सातत्याने नवनवीन शब्दाविष्कार करून आपले लेखन ते नटवीत, सजवीत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाला वाचनीयता ही मूल्य लाभले आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. लोकभाषा, लोकसाहित्य आणि लोक संस्कृतीच्या या अभ्यासकाला वाढदिवसाच्या निमित्ताने मन भरून कोटी कोटी शुभेच्छा…मंगल कामना…!!
– डॉ. मारोती कसाब
मराठी विभाग,
महात्मा फुले महाविद्यालय,
अहमदपूर जि. लातूर
मो. ९८२२६१६८५३