दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा..रब्बीचा हंगाम सुरू असून शेतकरी शेत पिकाच्या कामात गुंतला आहे. अशातच रासायनिक खताचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांनी खताचे भाव वाढविले आहेत. त्यामुळे शेतकरी आता अतिशय संकटात सापडला असून हवालदिल झाला आहे.
पावसामुळे मागील पिकाचे झालेले अतोनात नुकसान शेतमालाचे पडत चाललेले भाव दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव या संकटामुळेशेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांची रब्बी पिकावर मदार होती. यावर्षी रब्बी पिकाची अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली असून लाखो हेक्टर क्षेत्र पेरणी झाली आहे. ही पिके डोलत असतानाच विविध कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमतीत सरासरी १०० ते २०० रुपयांनी भाव वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. दुसरीकडे खताच्या किमतीवरती नियंत्रण ठेवण्यास सरकारही अपयशी ठरत असल्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न रब्बी उत्पादक शेतकऱ्यांना पडलाआहे. नाईलाज असल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची खरेदी करावी लागत आहे. यंदा सुरूवातीपासून ते शेवट पर्यंत पाऊस अति झालेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. परंतु ही पेरणी झाली की कंपन्यांनी शेतकऱ्यावर घाला घालत खताचे भाव वाढ केली आहे. मागील वर्षीच्या खताच्या भावाच्या तुलनेत यंदा भाव वाढलेली असून खताच्या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांची शेतीची नियोजन बिघडले असून शेतीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.