दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
देगलुर…. आधुनिक काळात विज्ञानाच्या विविध प्रकारच्या प्रगतीबरोबरच अज्ञानाच्या विचारधारेचा आपण अंगीकार करीत आहोत . मुले ही परिपक्व व सक्षम झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये . बालविवाह करणे म्हणजे सामाजिक समतेच्या विचाराला लागलेला कलंक आहे असे विचार राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय समन्वयक प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे यांनी प्रतिपादित केले .
देगलूर महाविद्यालय , देगलूरचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर मौजे रामपूर याठिकाणी घेण्यात आले . या शिबीराच्या पाचव्या दिवशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख तथा कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. संतोष येरावार तर प्रमुख पाहुणे मुखेडच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी तथा क्षेत्रिय समन्वयक प्रा.डॉ.चंद्रकांत एकलारे तर व्यासपीठावर रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. सुरेश काशिदे , प्रा.विनोद काळे , प्रा. वाकडे हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. व्यंकट खंदकुरे तर आभार प्रदर्शन स्वयंसेवक पोटफोडे यांनी केले .
डॉ. एकलारे यांनी आपल्या भाषणातून कोरोना काळातील पालकांची वाढणारी चिंता , बदललेली सामाजिक मानसिकता यामुळे बालविवाह होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे . यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्हे अतिशय चिंताजनक अवस्थेत आहेत . यामुळे सामाजिक असमतोल वाढत आहे . बालविवाहामुळे परिवाराची मानसिक आणि आर्थिक स्थिती बिघडत आहे . या परिस्थितीवर मात करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे असे विचार व्यक्त केले . अध्यक्षीय समारोपातून डॉ. येरावार यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महत्त्व , उद्देश , युवकांची जागरूकता , राष्ट्र उभारणीसाठी युवकांची भूमिका , सेवाभाव , महाविद्यालयीन शिक्षणातून भविष्यातील स्वप्नांची होणारी पूर्तता इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकला आहे . याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. रत्नाकर लक्षट्टे , सरपंच प्रतिनिधी पांडवे , महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व स्वयंसेवक इत्यादी जण बहुसंख्येने उपस्थित होते .