दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधी:- मानिक सुर्यवंशी.
“सखी तुझ्या संग पावसात भिजू दे…
काळजात लागलेली आग विजू दे…”
या बालाजी पेटेकर खतगावकर यांच्या प्रेम कवितेला महाविद्यालयीन युवकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने देगलूर महाविद्यालय देगलूर येथील कविसंमेलन चांगलेच रंगले. मराठी भाषा आणि साहित्य संवर्धन वैश्विक स्तरावर पोहोचण्यासाठी देगलूर महाविद्यालय मराठी विभागाकडून कविसंमेलन घेण्यात आले होते. कवसंमेलनाच्या अध्यक्षपदी मिलिंद शिकारे हे होते. या कविसंमेलनात “सजनाची मिठी बाई सुटता सुटना” या श्रीनिवास मस्के यांच्या काव्यपंक्तीने कवी संमेलनास झोकात सुरुवात झाली. त्यांच्या “नापास झालो जी” या विडंबन कवितेला युवावर्गानी भरभरून प्रतिसाद दिला. नरेंद्र धोंगडे, कवयित्री रोहिणी पांडे, अंजली मुनेश्वर यांच्या कविता उपस्थितांना अंतर्मुख करायला लावल्या. लक्ष्मण मलगिरवार यांनी “तिच्या शेता शेजारी” ही शेताचे भरलेले वर्णन करणारी कविता सादर केली. कविसंमेलनाचे अध्यक्ष मिलिंद शिकारे यांनी “गोधडी” या कवितेतून सामाजिक दंडावर भाष्य केले. तर रानफुलकार पांडुरंग पुठ्ठेवाड यांची कविता लक्षवेधक ठरली. त्यांनी “तू”या कवितेतून सुख दुःखातही आपण साथ सोडणार नाही, अशा प्रियकर आणि प्रेयसी यांच्या नात्यातील आश्वासकता प्रकट केली. कवी धोंगडे यांची आई वरील कविता एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन गेली. महेश कुडलीकर यांची कविता उत्कृष्ट ठरली. कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवी श्रीनिवास मस्के यांनी केले
या वेळी देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ सर यांनी उद्घाटन कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपपर मनोगत व्यक्त केले. .देगलूर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख मराठी विभागाचे प्रा. डॉ.विठ्ठल जंबाले यांनी प्रास्ताविकातून देगलूर महाविद्यालयातील मराठी विभागातील माजी विद्यार्थ्यांचे कार्य वैश्विकतेशी नाते जोडणारे आहे. असे मत व्यक्त केले. डॉ.सर्जेराव रणखांब यांनी सूत्रसंचालन तर डॉ.राजेश्वर दुडुकनाळे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव मैलागिरे, सहसचिव सूर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार, कार्यकारिणी सदस्य रवींद्र द्याडे हे उपस्थित होते. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, रसिक श्रोते विपुल संख्येने उपस्थित होते.