दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली. रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही.
बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी यावर मात केली. बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही. आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्यात. कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता नाही. अथांग दु:खाचे कधी भांडवल केले नाही त्यामुळेच माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
येथील माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेवर अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौध्द महासभेचे तालूकाध्यक्ष एम.एन.क्षीरसागर,रिपाई तालूकाध्यक्ष अरूणभाऊ वाघंबर,चळवळीतील नेते अण्णाराव सूर्यवंशी,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सूरूवातीला त्रीशरण,पंचशिल घेवून सामूहिक अभिवादन करण्यात आले.
पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी म्हणाले की,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत माता रमाई यांचे योगदान अतुलनीय होते. रमाई यांनी केलेला त्याग, बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ, प्रेरणा आणि त्यांच्या संघर्षांच्या काळात दिलेला पाठिंबा कौतुकास्पद आहे.
रमाई यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची खूप मोठी आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या सदैव सोबत राहून त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहित केले. बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्त्वाचा आदर संपूर्ण जगात केला जातो. त्यांना विश्वविख्यात करण्यात रामाईंचे मोठे योगदान आहे. ज्या वेळी बाबासाहेबांना कठीण परिस्थितीत कोणी साथ देत नव्हते, त्या वेळी रमाई यांनी बाबासाहेबांची साथ कधीच सोडली नाही. डॉ. बाबासाहेबांनी भारतीय महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न केले. त्याचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे. संविधानाने भारतीय महिलांना समान अधिकार आणि हक्क दिले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एन.क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रशांत जाभाडे यांनी मानले.या प्रसंगी त्रीशरण मोहगांवकर,अजय भालेराव,भीमराव कांबळे,सचिन बानाटे, देवीदास ससाणे,मोहम्मद मौजन,भूरकापल्ले आदींनी पूढाकार घेतला.