दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यात विजेच्या लोंबणाऱ्या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन लागलेल्या आगीत सांगवी उमर येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या असलेल्या आठ एकरातील ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील सांगवी उमर येथील कल्पना राजाराम पाटील, हर्षा दिलीप पाटील यांचे मेदनकल्लूर शिवारालगत शेत आहे. त्यांच्या गट क्रमांक १२३ मध्ये असलेल्या दोन एकरवरील ऊसाला ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे अवघ्या दहा पंधरा मिनिटांमध्ये त्यांचा ऊस जळाला. वाऱ्यामुळे त्यांच्या शेतातील आगीची मोठी ठिणगी शेजारी असलेल्या ज्ञानेश्वर जाधव यांच्या शेतातजाऊन पडली. त्यामुळे ज्ञानेश्वर जाधव यांच्या ६ एकर क्षेत्रावरील ऊस देखील जळाला. ऊसाला लागलेली आग विझवण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला, परंतु या शिवारात असलेली विद्युत डीपी गतवर्षीपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आग विझविण्यासाठी पाणी मिळाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी ऊस जळत असलेला पाहावा लागला. या आगीत या तीन शेतकऱ्यांचे तब्बल ९ लाख रुपयांचे नुकसानझाले आहे. यासंदर्भात बोलताना ज्ञानेश्वर जाधव म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून देगलूर येथील अधिकाऱ्याकडे डीपी दुरुस्त करण्याची मागणी करीत आहोत, परंतु देगलूरचे अधिकारी नरंगलला पाठवतात आणि नरंगलचे अधिकारी कांहीच करीत नाहीत. अधिकाऱ्यांच्या या चालढकलीमुळे आणि हलगर्जीपणामुळे आमचा ऊस जळाला आहे. महाराष्ट्र शासनाने त्वरित आम्हाला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.