दैनिक चालु वार्ता वाशिम प्रतिनिधी-वसंत खडसे
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नसून, ते नव~समाजरचनेचे व नव्या कृषिरचनेचे जनक होते.त्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्या कृषिरचनेची संस्कृती निर्माण केली. त्यांच्या एकंदरित राज्यकारभाराचा बारकाईने अभ्यास केला तर, छत्रपती शिवाजी महाराज हे नावापुरते राजे नसून ते लोकं कल्याणकारी, आपल्या रयतेवर जिवापाड प्रेम करणारे ” जाणता राजा ” होते याची आजही अनुभूती येते. असे प्रतिपादन वाशिम जि. प. सदस्य अमित खडसे पाटील यांनी केले ते शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलतांना अमित खडसे पाटील यांनी महाराजांच्या ऐतिहासिक आज्ञापत्राचा दाखला देत महाराजांनी राबविलेल्या कृषीरचना संस्कृतीची थोडक्यात पण, विस्तृत अशी माहिती दिली. अशाच एका आज्ञापत्रात महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना म्हणजेच त्या काळातील सुभेदार,वतनदार,देशमुख,पाटील आदींना परखड शब्दात सांगितले की, ” तुमची पदं व अधिकार ही रयतेच्या कल्याणासाठी सोपवलेली जबाबदारी आहे. तुम्ही केवळ पदाधिकारी असून रयतेचे मालक नाहीत, म्हणून तुमच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही तरी चालेल परंतु माझ्या स्वराज्यात कोणीही उपाशी राहता कामा नये, शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडवणूक करू नये, स्वराज्यात नव्याने दाखल झालेल्या शेतकऱ्यांना नांगर, बी~बियाणे आणि आर्थिक मदत करा, ” अशा प्रकारचा आदेश केला. यातूनच महाराजांचे कुशल प्रशासन, आपल्या प्रजेवर असलेले प्रेम व विशेषतः शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा स्पष्ट दिसून येतो. आणि आजही छत्रपती शिवरायांच्या कृषी धोरणांचा काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास यातून शेतकऱ्यांना खुप मोठा दिलासा मिळेल असेही शेवटी अमित खडसे पाटील यांनी नमूद केले.
सदर शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात विविध जाती~धर्मातील शेकडो अबाल~वृद्ध आणि माता~भगिनींनी स्वईच्छेने सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला.