दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी .
●दि. २५ फेब्रुवारी, २०२३रोजी ७३ व्या वाढदिवसानिमित्त लेख…..
जेष्ठ बालसाहित्यिक शं.ल.नाईक हे बालकविता लिहिण्यात रममाण होतात. त्यांची पुस्तके वाचताना मुलांना खूप आनंद होतो. मुलं त्यांच्या कविता पुन्हा पुन्हा वाचतात.
वाचून मनसोक्त आनंद लुटतात!
याचं कारण नाईकांनी मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आहे.
ते स्वतः शिक्षक होते. त्यांना मुलांना काय आवडते,काय आवडत नाही हे चांगलं समजते. त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये म्हणजे सहजोच्चारी शब्दरचना, शब्द लईचे सुंदर भान आणि मोहक फँन्टसी.
त्यांची आजपर्यंत तब्बल बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गंमत नगरी,प्राण्यांची शाळा,सोनी मोनी, नदी किनारी, माकडोबाची वरात, डोंगरझाडीत,पिल्लू,सुंदर भारत घडवू,मुलं थोडी संसारात गोडी, छान छान कोडी, कोडी ओळखा कोडी,
कोडी सोडवा चिञे रंगवा असे बालकवितासंग्रह प्रकाशित आहेत.
एक बालगीत ध्वनीफितही निघाली आहे. त्या गीताचे नाव आहे,’जीवन सुंदर करू’! त्यांच्या पाच कविता जेष्ठ बालसाहित्यिका डाॅ.विजया वाड यांच्या बालकोशात आणि चार कविता डाॅ.मंगलाताई वरखेडे यांच्या बालकोशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ही फारंच अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या बर्याच कविता संस्कार देणाऱ्या आहेत. त्यांच्या काही कविता मराठी सुगम भारती इयत्ता पाचवी,सहावी व आठवीच्या पाठ्यपुस्तकात घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या साहित्याची भाषा सोपी असून मुलांना समजेल अशी आहे. त्यांचा एक चांगले कवी म्हणून लौकिक आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बाल वाड:मय निर्मितीचा ‘बालकवी’ पुरस्कार सन २०१६ ला प्राप्त झाला आहे. इतर संस्थांचेही पुरस्कारांनी शं.ल.नाईक सन्मानित आहेत. कार्यक्रमातून ते मुलांना “हसा, खेळा,नाचा!खूप खूप वाचा!!” असा संदेश देतात.
वर्षानुवर्ष लहान मुलांसाठी सातत्याने दर्जेदार लेखन करणारे शं.ल.नाईक हे मुलांचे आवडते बालसाहित्यिक आहेत. किशोर, सवंगडी,मुलांचे मासिक आणि बालसाहित्याला वाहिलेल्या मासिकातून त्यांनी लेखन केले आहे. बी.ए.प्रथम वर्षात त्यांची एक कविता समाविष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या लिखाणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे. विविध वृत्तपत्रे,नियतकालिकांतून त्यांचे लेखन आजही चालू आहे. पाचवीच्या स्कॉलरशिपच्या पाठ्यपुस्तकातही त्यांच्या काही कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
बालकवितांची रचना हा छंद जोपासणाऱ्या नाईक गुरूजींनी संस्काराचे व मनोरंजनाचे महत्त्व ओळखले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शेकडो बालकविता लिहिल्या आहेत. हजारो बालकांना आपल्या काव्य वाचनातून हसायला व बोलायला लावले आहे. बालसंस्काराचे धाराव्रत घेतलेल्या नाईक गुरूजींना मुलांना संस्कार देण्याची आवड आहे. त्यांनी आजन्म बाल वाड:मय लिहिले आहे.
“करील मनोरंजन जो मुलांचे,
जडेल नाते प्रभूशी तयांचे..”
असा आशीर्वाद पुज्य साने गुरूजींनी तमाम साहित्यिकांना देऊन ठेवला आहे. अर्थात बालसाहित्यिकांना “शामची आई” या पुस्तकातून संस्काराचे बीजारोपण केले आहे.
त्याचा आता वटवृक्ष फोफावला आहे. गुरूजींचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात हजारो हात लिहिते झाले.
विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पिढ्या घडत आहेत. खास करून बालकुमारांसाठी ज्यांनी आपली लेखणी झिजवली त्यात मराठवाड्यात एक नाव ठळकपणे सामोरे येते ते शं.ल.नाईक होय.
शं.ल.नाईकांच्या बालकवितेबद्दल निःसंदिग्धपणे असे म्हणता येईल की, ती कुठल्याच अर्थाने पराभूत नसून अस्सल देशी आहे. नाईकांच्या कवितेत जे काही आहे,ते गुण दोषांसहीत त्यांचे स्वतःचे आहे.
‘झाडाचं मूल’ ही कविता पहा.
“डोळे उघडून म्हणालं फूल,
झाडाचं मी आहे मूल!
अंगावर माझ्या कपडे रंगीत,
वाऱ्याचं मी ऐकतो संगीत!
फुलपाखरं मला भेटायला येतात,
भोवती भुंगे गाणी गातात!
उन्हात मी मांडतो खेळ,
मजेत जातो सारा वेळ!
झाडाच्या मी खांद्यावर बसतो,
आनंदानं मी गालात हसतो!
मुलांना आवडावी अशी सुंदर कविता आहे. कळीचं फूल होणं म्हणजे कळीने डोळे उघडणं, फुलावरचे नानाविविध रंग म्हणजे फुलांनी परिधान केलेले रंगीबेरंगी कपडे. बाकीची मुलं उन्हात खेळत नाहीत, पण फूल माञ आपला खेळ उन्हात मांडूनही आम्लान राहतात.
झाडाचा वरचा भाग फांद्या म्हणजेच झाडाचा खांदा,लहान मुलांना प्रौढांच्या खांद्यावर बसायला आवडते. तर फूल झाडाच्या खांद्यावर बसतात. हास्य फुलांच्या गालावर फुलतं तर कळी हसून फुल होते, असे कितीतरी सुंदर अर्थ कवितेतून ध्वनित होतात.
बालकांसाठी लिहिताना साहित्यिकांना बालक होऊन जगावं लागते. त्यांच्यासाठी फुलपाखरू होऊन बागेत बागडावं लागतं. त्यांच्या बालविश्वातील निरागसपणा नेमका पकडून चालत नाही तर त्यांच्यासोबत निरागस बालक व्हावं लागतं. तेव्हा कुठे बालसाहित्यिकाची निर्मिती होऊ शकते. पानांची सळसळ,पाण्याची खळखळ, पक्ष्यांचा चिवचिवाट, आकाशातील पांढरे बगळे,निळे आकाश,मऊ मुलायम कापूस,धुंद करणारा वारा,
रंगीबेरंगी पतंग, उंचच उंच हिरवेगार,
डोंगर,नागमोडी वाट,नागिणीसारखी वळणे घेत पळणारी नदी,गर्द झाडी,किर्रर अंधार, निसर्गातील विविध रूपे कवीला नेहमी खुणावत असतात.चिमणी,साळुंखी,राघू,मैना,खारूताई,ससा,उंदीर मामा,मनीताई, गाई,वासरू,सिंह,वाघ,अस्वल,हुशार कोल्हा,दगाबाज लांडगा,हत्ती, जिराफ,उंट कासव अशा पशुपक्षी,प्राण्यांना बोलतं करण्याची किमया बालसाहित्यिकांकडे असते.
लहानशा मुलांपुढे अवघे विश्व जीवंत करतो ती जादुगिरी बालसाहित्यिकांच्या लेखनात असते.
ती शं.ल.नाईक यांच्या लेखनात उतरली आहे.
●शब्दांकन
●जाफर आदमपूरकर, नांदेड.
●भ्रमणभाष-९७३०१६१३७८.