दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
● मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे काम ठप्प
● अर्धवट ठेवलेल्या कामामुळे नागरिकांना त्रास
● स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम कधी होणार ?
● चिरगाव बागेचीवाडी ग्रामस्थ संतप्त.
म्हसळा – रायगड
रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. म्हसळा तालुक्यातील देखील काही गावातील जोडरस्त्यांना मुख्यमंत्री सडक योजनेतून मान्यता मिळाली आहे परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे व या योजनेशी संबंधित असलेल्या अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे रस्त्यांची कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे परिणामी याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. म्हसळा तालुक्यातील चिरगाव बागेची वाडी या गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावर ते चिरगाव बौद्धवाडी पर्यंत सुमारे 2 कोटी मंजूर खर्चाचे 02.500 किमी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. हे काम करण्यासाठी सुप्रभात इन्फ्रा प्रा.लि.अलिबाग यांनी ठेकेदारी घेतली आहे. या कंपनीने मागील तीन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली मात्र हे काम पूर्ण न करताच अर्धवट अवस्थेत ठेवल्याने सद्यस्थितीत रस्त्याचे काम ठप्प झाले असल्याने व अर्धवट ठेवलेल्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
संबंधित ठेकेदारा करवी रस्ता सुधारणा करणे कामात खुपच दिरंगाई होत आहे. ठेकेदाराने कामात दिरंगाई केली असून नवीन रस्ता तर झालाच नाही परंतु जो दगड मातीचा रस्ता होता त्याच्या दोन्ही बाजूला खोदून ठेवले आहे. अनेक ठिकाणी खोदून ठेवले असल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळून रस्त्याचे काम अर्धवट ठेवल्याने तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील मंजूर कामाची ऐशी की तैशी,अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तीन महिन्यांपूर्वी नवीन कामाला सुरुवात केली पण हे काम अत्यंत धिम्यागतीने होत असल्याने रस्ते विकास ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे नागरिकांना मात्र मोठया प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.गावातील वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी, दैनंदिन कामासाठी प्रवास करणारे प्रवाशी नागरिक यांना अर्धवट तसेच रस्त्याचे काम न झाल्याने खूप त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खोदून ठेवल्याने गावात वाहने येत नाही त्यामुळे नागरिकांना अडीच ते तीन किलोमीटर चालत जाऊन पायपीट करून दैनंदिन प्रवास करावा लागत आहे. मंजूर असलेल्या रस्त्याचे काम योग्य दर्जासह लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
◆
बागेची वाडी या गावचे रस्त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तिन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी या दोन्ही राजकीय पक्षांकडून या कामाचे वेगवेगळे दोन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते त्याचबरोबर विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या चिरगाव बागेची वाडी या गावासाठी डांबरी रस्ता होत आहे. एवढी मोठी भयानक परिस्थिती असूनही आणि मंजूर झालेला रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम पूर्ण कधी होणार..? असा संतप्त सवाल चिरगाव बागेचीवाडी ग्रामस्थ करीत आहेत.
प्रतिक्रिया :
सावर ते चिरंगाव हा मुख्य रस्ता असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील या मंजूर रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नाही त्यामुळे आमच्या गावातील नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे, दैनंदिन कामासाठी दगड धुरळा अंगावर घेऊन तालुक्यापर्यत पायपीट करावी लागते. त्याचबरोबर अर्धवट असलेल्या रस्त्याचे कामाचे बाबतीत संबंधित इंजिनिअर व ठेकेदार यांना अनेक वेळा कल्पना दिलेली असून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून मिळावे अशी मागणी आहे.
श्री.किशोर गुलगुले
माजी सरपंच तथा गाव अध्यक्ष – चिरगाव बागेचीवाडी
” सावर ते चिरगाव बौद्धवाडी या रस्त्याचे कामाचे सद्यस्थिती बाबत मला काही माहिती नाही मी तेथील तालुका इंजिनिअर यांचेकडून माहिती घेणार आहे.
श्री.आनंद गोरे
सबडीव्हीजन कार्यालय अलिबाग
“सावर ते चिरगाव बौद्धवाडी रस्त्याचे काम सुरू आहे परंतु मागील काही दिवसांपासून संबंधित ठेकेदार यांना काम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत, तरीही सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आमचे टार्गेट आहे.”
जसवंती आवेरे -उपअभियंता माणगाव
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना