दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
.सणामागून सण येत राहतात जात राहतात. प्रत्येक सण भारतीय लोक साजरा करतात. कोणी जोमाने साजरा करतात तर कोणी जोर लावून. भारतातील आठरापगड जातीत सण साजरे करण्याची आपआपली पध्दत आहे ,रित आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकजण सण साजरा करत असतो.
दिवाळी प्रकाशाचं सण तर दसरा आनंदाचा सण. पंचमी बाईलेकीचा सण म्हणून साजरा केला जातो.पोळा बैलाचा सण तर होळी रंगाचा सण आहे. प्रत्येक सणामागे काहीतरी घटनाक्रम असतो ;पण ते घटनाक्रम सर्वांनाच माहित असते असे नाही.बहुतेक लोक आपले पूर्वज हा सण साजरा करत होते म्हणून आपणही साजरा करतोत. सणाचा इतिहासात कोणीही आजकाल घुसत नाहीत. चंगळ करणे येवढेच माहित आहे.
होळी हा सण भारतभर साजरा केला जाणारा सण.भारतात बंजाराची होळी सणाची मजा काही निराळीच आहे. बंजारा होळीच्या महिन्यात बेफाम होवून नाचतो. तो बेफाम होवून गातो. या काळात बंजारा तरुण स्त्री-पुरुष, अविवाहीत तरुण मुलं मुली, वयस्क स्त्री पुरुष व बच्चेकंपणी वर्षभराचं दुःख विसरुन,दारिद्रय विसरून आनंदाने लेंगी म्हणत हा सण उत्साहात साजरा करतात. होळीच्या महिन्यात दुःख दारिद्रय विसरून फक्त सुखच कवेत घेण्याचा प्रयत्न बंजारा समाज करताना दिसतो.
मराठी भाषेत एक वाक् प्रचार आहे अधिच उल्हास त्यात फाल्गुन मास.पण बंजारा समाजालाही म्हण लागू होत नाही.बंजारा समाजात या महिन्यात उल्हास,आनंद, मौजमजा , मस्तीचा बेफाम संचार झालेला असतो. जेवढं चंद्राच चांदणं लखलखीत तेवढं बंजारा मन चकचकीत होत जाते. स्त्री पुरुष्याचा वेगवेगळ्या घोळक्यात लेंगी गायली जाते. या काळात मुद्दामच लाकडाची छान टिपऱ्या तयार करुन घेतात. पुरुष गोल रिंगन करुन ढाल्याच्या डफावर ताल धरतात.सगळ्याचे हात पाय ताल धरतात.चालीवर लेंगी गायली जाते. हे लेंगी (गीत) सुरवातीस धार्मिक असते. नंतर समाज प्रबोधनपर असते.नंतर थोडीशी चावट होत जाते. प्रेमाच्या रंगाला, प्रेमाच्या इंद्रधनुष्याला येथेच धुमारे फुटतात. कधी आंबट तर कधी गोड तर कधी थोडीशी कडू चव येथेच बनते. कधी त्यातून विरह वाहतो.
बंजारा समाजासाठी होळी गीत याने लेंगी हे क्षणासाठी दुःख विसरुण आनंदाच्या डोहात पोहण्याचा प्रकार आहे. अखा तांडा होळी गीत गाण्यात गुंग होवून जातो.तो बेभान होतो. युरोपातील जिप्सी लोक जसे रात्रभर नृत्य करतात तसंच बंजाराही नृत्यात रममान होतो. येथे बंजारा क्षणाकरिता दुःख प्रशान करतो व आनंदाची पखरण करतो.
होळी गितातून मनातील सप्तरंगाची उधळण बंजारा स्त्री पुरुष,तरुण मुले मुली करतात. या गितात चावटपणा असतो ;पण अश्लीलता नसते. दोष दाखवले जाते ;पण त्यात कोणाचा द्वेष नसतो.वहिनी दिर हे ऐकमेकांची प्रेमळपणे टर उडवतात त्याच वेळी पवित्र नातंही जपलं जाते.नात्याला काळिमा फासला जात नाही. पावित्र नातं नेहमीच जपलं जाते.
लेंगी गीतातून स्त्री पुरुष , तरुण मुले मुली सवाल जवाब करतात ;पण यात वैयक्तीक द्वेष नसतो. येथे कोणीच दुःशासन,दुर्योधनची भूमिका वटवत नाही.जे काही चालते ते निर्मळ भावनेने चालते. मनाच्या सप्तरंगात कुठेतरी काळा रंग कोणाच्या तरी मनात थोडासा जास्त साचलेला असू शकतो तरीही त्या काळ्या रंगात इतर रंग मिसळून जातात व काळा रंग स्वतःचा काळेपणा विसरुण इतर रंगात एकरुप होतो.
खरंतर फाल्गुन महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. निसर्ग उदास भकास दिसत असतो. सूर्य आग ओकायला सुरवात केलेली असते. झाडे अंगावरची पाने फेकून देवून थोटासारखी थांबलेली असतात. येवढया रखरखत्या उन्हात बघा पळस कसा फुलतोय ते. डोंगरात फेरफटका मारलं की जाणवते जणू काही पळसाला ज्वाला पेटली आहे. तो तारुण्याने मुसमुसलेला आहे हे तो इतरांना सांगत आहे असे जाणवते. निसर्गही जणू संदेश देत असतो मानवानो कितीही दुःख येवू द्या ते झेलण्यासाठी तुम्ही सज्ज रहा. होळीचा महिनाही मानवजातीला हाच संदेश देत असावा की मानवानो दुःखाला मोजत बसण्यापेक्षा दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा आलेला सुखाचा, आनंदाचं क्षण मजेत लुटा. दुःखात ही पळसासारखं फुलत रहा. दुःख झेलायला शिका. ते पचवायला शिका.
म्हणून बंजारा फाल्गुन महिण्यात वर्षभराचें दुःख मोजत बसत नाही. यात तो दारिद्रय गरिबीची फिकीर करत नाही. त्याची तमा बाळगत नाही. तो नाचतो तो गातो.होळीच्या शेवटी रंगाची उधळण केली जाते. त्यात एकमेकांच्या मनाचे सप्तरंग एकत्र येतात. एक होतात. त्यातून मानाच्या आनंदाचं इंद्रधनुष्य तयार होतो. व सगळेच लहानथोर स्त्री पुरुष आनंदाने डोलत राहातात, झुलत राहतात.
आजकाल होळी साजरा करण्याची पदधत बदलत चालली आहे.काळानुसार बदलत जाणे हा निसर्गाचा नियम आहे. होळी साजरी करताना पूर्वी फक्त वयस्क मंडळीचं दारू पियायचे. तरूण मंडळी नशापाणी पासुन दुर राहत ;पण काळ बदलत गेलं. तांडयातही अधुनिकतेचे वारे वाहायाला लागले. बाप व मुलगा एकाच बाजेवर बसुण पियायला लागले. अधुनिकतेच्या नावाखाली संस्कृतीचा ऱ्हास होत राहीला. या दारूमुळे घर फुटायला लागले. प्रेम फाटत चाललय. नाते तुटत चालले आहे. माणुसकी संपत चालली आहे. आपुलकी जिव्हाळा नाहीसं होवून त्याची जागा देवादावा, व्देष, मत्सरने घेतली आहे.
होळीमध्ये नशापाणी केले जाते.ही नशा मग घरातच होळी पेटवते. घरातील हेंडगा आळीत व आळीतून वसतीत पसरत जाते. मला सर्व जातीधर्मातील समाजबांधवाना सांगायचं आहे आपण पाण्यात बुडणाऱ्यानां वाचवू शकतो ;पण ग्लासामध्ये बुडणाऱ्याला वाचवू शकत नाही. ग्लासात बुडणाऱ्याला कोण वाचवले ? ग्लासामध्ये बुडणारा स्वतः संपत जातो पण तो इतरालाही सोबत घेवून बुडत असतो.नशा कोणतीही असो ती वाईटच आहे . मग ती नशा धर्माची असो की जातीभेदाची, श्रीमंतीची असो की वंशभेदाची यामुळे नुकसान होतं ते पर्यायाने देशाचं म्हणून आपण ग्लासात बुडणाऱ्याला वाचवलं पाहिजे.त्यासाठी घरातील ,शेजारी ,वेगवेगळे समाज ,धर्म वंश यात एकोपा पाहिजे.गाव तांडे वाडी शहर हे बॉटल व ग्लास मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. समाज व शासनस्तरावर यासाठी उपाययोजना झाली पाहिजे. घराघरातून प्रयत्न केले पाहिजे.
होळीच्या रंगपंचमीला सप्तरंगाची उधळण करताना त्यात काळा रंग दिसू नये आसी काळजी घेणे हे सर्व वडीलधारी मंडळीच काम आहे.काळा रंग आपण मुळासकट नाहीसं करू शकत नाही ;पण तो रंग इतर रंगापेक्षा ऊठावदार दिसणार नाही याची तरी दक्षता आपणास घ्यावीच लागेल.
राठोड मोतीराम रूपसिंग
नांदेड _६
९९२२६५२४०७ .