दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये पहिल्यांदाच जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्याला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, असं ते उघडपणे म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवरही निशाणा साधला. “आज संजय कदम आणि त्यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत आणलेले आहेत. हो मी शिवसेनाच म्हणणार. कारण निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही. अजिबात नाही. निवडणूक आयोग चिन्ह आणि नाव देऊ शकतं. पण पक्ष देऊ शकत नाही. आम्ही देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले.
“तुम्हाला कोण विचारत होतं. भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं. तेव्हा शिवसेनाप्रमुख यांच्या मागे उभे राहिले नसते तर आज हे कुठे राहिले असते? पण एवढं निष्ठुर आणि निर्घृणपणाने वागत आहेत की, ज्याने सोबत दिली त्यांना पहिले संपवा. बघा प्रयत्न करुन”, असं आव्हान त्यांनी दिलं.
गोळीबार मैदान. मैदानाचं नाव खूप चांगलं आहे. पण मला शिवसैनिकांनी एक शिकलंय. ढेकण्या चेहऱ्याला गोळीबाराची गरज नसते. ढेकण आपलं रक्त पिवून फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकण्यांना चिरडणार आहे. तोफेची काय गरज आहे? या तोफा आहेत ना. मुलखमैदान तोफा आहेत. आज सुद्धा दोन-तीन तोफा गडाडल्याच ना. भास्कर जाधव, गिते आहेत, सुषमा अंधारे आहेत. संजय कदम आता आणखी एक तोफ आपल्यासोबत आलेली आहे. पण तोफा या देशद्रोह्यांविषयी वापरायच्या असता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“दुर्देवं असं की ज्यांना आपण कुटुंबीय मानलं. ज्यांना मोठं केलं. त्यांनीच आपल्या आईवर वार केलाय. होय, शिवसेना ही आपली आई आहे. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर तुम्ही-मी कोण होतो? आज जे टिमक्या वाजवत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. तुमचा जन्म तेव्हा कदाचित झाला असेल, मुंबईनंतर पहिला भगवा इथे फडकला होता”, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढली.