दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -भरत पाटील पवार.
बिलोली प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे यांच्याकडून अनुसूचित जातीतील पीएच. डी चे उच्च शिक्षण घेऊन संशोधन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना मागील जवळपास दोन वर्षांपासून फेलोशिप नं मिळाल्याने संशोधक विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या उलट मराठा, ओबीसी, एस.टी च्या सर्वच संशोधक विद्यार्थ्यांना अनुक्रमे सारथी व महज्योती यांच्याकडून मागील दोन वर्षपासून नियमित मिळते. तर मग अनुसूचित जातीच्याच विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक शासनाकडून डावळले जात असल्याचा आरोप करत मागील 15 दिवसापासून संशोधक विद्यार्थी हे मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलनास बसले आहेत. मात्र शासन स्तरावरून कुठल्याही पद्धतीची सरसकट फेलोशिप संदर्भात कारवाई न झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात बार्टी कडून मिळणारी फेलोशिप ही तत्काळ सरसकट मंजूर करून अवॉर्ड लेटर देण्यात यावेत. या प्रमुख मागणीसाठी मुंबई विधान भवनावर 9 मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
बार्टीला भीमा कोरेगाव किंवा इतर जाहिरातीवर खर्च करण्यासाठी कोट्यावधी रुपये आहेत मग उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी बार्टीकडे पैसे नाहीत का? असा सवाल आनंदराज आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. आज अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी मागील पंधरा दिवसापासून ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता बसलेले आहेत मात्र मुख्यमंत्री किंवा शासनाचा प्रतिनिधी इकडे फिरकलं नसल्याचा आरोप संशोधक विद्यार्थी करीत आहेत.
भारतीय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागते. मराठा,ओबीसी,एस. टी च्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागास असणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून या शिंदे- फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक दूर ठेवत असल्याचा आरोप संशोधक विद्यार्थी तथा इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी केला आहे. या आंदोलनास हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संशोधक विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आले आहे.