दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कर्ज मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने लाभधारक अंगद शिंदे यांचा प्रत्यक्षात दुकानात जाऊन सन्मान करून त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या आहेत .
अधिक माहिती की . महाराष्ट्र शासनाने धाराशिव जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार सहायता व पंतप्रधान रोजगार सहाय्यता योजने अंतर्गत ज्यांना व्यवसाय करायचा आहे , त्यांना अर्थसहाय्य मिळवून देणे व ज्यांचा व्यवसाय चालू आहे , परंतु भांडवलाची कमतरता आहे, अशांना आर्थिक बळ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने माजी मंत्री आ . राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उद्योग केंद्राच्या योगदानातून संबंधित लाभधारकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जात होता..
यामध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात भूम शहरासह तालुक्यात असंख्य बेरोजगार युवक युवतीला अर्थसाह्य मिळाल्याने त्यांचे स्वतंत्र व्यवसाय सुरू होण्यास मदत झाली आहे . अशा पैकी भूम शहरातील इलेक्ट्रिक व्यवसाय करणारे अंगद शिंदे यांचा त्यांच्या दुकानात जाऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी आबा पाटील, जिल्हा सरचिटणीस आदम शेख , ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर , माजी नगरसेवक रोहन जाधव , सरचिटणीस हेमंत देशमुख, सचिन बारगजेसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सन्मान करून त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी “आत्मनिर्भर धाराशिव” संकल्पना राबवणे आवश्यक होते. यासाठी PMEGP व CMEGP या योजना महत्वपूर्ण ठरल्या. सदरील योजना जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने राबविण्यात आली आहे.
शासनाच्यावतीने जिल्ह्याला मार्च, २०२३ पर्यंत ६५० रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र वेळेच्या अगोदरच जिल्ह्याने ६५१ उद्योगांना बँकांकडून अर्थसहाय्य देऊन सदरील उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे सहाजिकच धाराशिव जिल्ह्यातील रोजगार निर्मितीत वाढ होऊन दरडोई उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.
या उद्योगांना जवळपास २५ ते ३५% प्रमाणे ७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यामुळे जिल्ह्यात २० ते २५ कोटी रुपयांचे उद्योग सुरू होत आहेत. यात सेवा तसेच उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे.
या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘बुथ तेथे उद्योजक’ या संकल्पनेतून जिल्ह्यात अनेक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, गावपातळीवर कार्यकर्त्यांमार्फत थेट संवाद साधून सदरील योजनेचा प्रसार भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे.
तसेच ज्यांना ही प्रकिया करणे अवघड वाटते त्यांना फॉर्म भरण्यापासून ते बँकेत कर्जाची फाईल मंजूर होऊन उद्योग व्यवसाय सुरू होईपर्यंत सर्व प्रकारचे सहाय्य कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. येणाऱ्या काळात यापेक्षा अधिक संख्येने उद्योग सुरू करुन नागरिकांना ‘आत्मनिर्भर’ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सर्व अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक या सर्वांच्या संयुक्त पुढाकाराने हे ध्येय वजा स्वप्न पूर्ण झाले आहे. यासंदर्भात भूम तालुक्यासाठी तेरणा परिवाराचे प्रा.किरण औटे प्रमोद सुतार भाजपचे भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश बापू बगाडे यांनी या संपूर्ण प्रक्रियेत उल्लेखनीय कार्य केले..