दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा आपल्याकडे
‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण प्रचलित आहे. परंतू आधुनिक युगातील युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. गावा गावात वाचनालय असूनही पुस्तकांचे वाचन करीत असलेल्या युवकांची संख्या नगण्य आहे. परिणामी वाचन संस्कृतीच संकटात सापडली आहे.केवळ सोशल मीडियावरील जुजबी वाचन युवक करीत असल्याने ते भरकटण्याची शक्यता बळावली आहे. तसेच परीक्षेच्या तोंडावर जुजबी वाचन करण्याकडे कल वाढत आहे. देशातील महान कवि, संत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, लेखक आदींनी आपले विचार ग्रंथरूपाने आपल्याला दिले आहे. या पुस्तकांचे युवकांनी वाचन करणे अत्यावश्यक आहे. पूर्वीखेड्यापाड्यातही युवकांचे वाचनाचे प्रमाण हे मोठे होते. परंतू आता वाचनाला युवा वाचकांची संख्या अत्यंत खालावलेली आहे. याउलट इंटरनेट कॅफेमध्ये तसेच मोबाईलवर सोशल मीडियावरच युवक मग्न असताना दिसतात. जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत गरजेचे आहे. जगण्याची उमेद निर्माण करणारे साहित्यवाचणे गरजेचे आहे. मात्र हल्ली युवकांना पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या युवक सर्वाधिक काळ मोबाईलवर तसेच दूरचित्रवाहिणी संचासमोर बसलेले आढळतात. तासनतास आपला वेळ चित्रपट, मालिका व इतर कार्यक्रम बघण्याकडे घालवितात. परीक्षेच्यावेळेसच फक्त ते पुस्तके वाचतांना दिसतात.