दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी – समीर मुल्ला
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला असून २७ मार्च पासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.भाजप – शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे.अवघ्या तीन दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय गोटात शांतता पहावयास मिळत आहे.
कळंब बाजार समिती जिल्ह्यात मोठी असून, महत्त्वाची मानली जाते. या बाजार समितीचे एकूण १८ संचालक आहेत. बाजार समितीचे २,६७० मतदार आहेत. यामध्ये ११ संचालक सोसायटी मतदारसंघातून, चार ग्रामपंचायत मतदार संघातून, व्यापारी अडते २, माल मापाडी १, असे १८ संचालकांच्या जागा आहेत. कोणीही शेतकरी सोसायटी, ग्रामपंचायत यामध्ये कोणत्याही जागेवर उभा राहू शकतो.कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोसायटी मतदारसंघात ९०९ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात ८१८, अडते-व्यापारी ७८६, हमाल-मापाडी १९६, असे मतदार आहेत.येत्या २७ रोजी ते ३ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे,५ एप्रिल रोजी छाननी,६ एप्रिल रोजी नामनिर्देशनपात्राच्या यादीची प्रसिद्धी देणे,६ ते २० एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज माघे घेणे,२१ एप्रिल रोजी अंतिम उमेदवारांना चिन्हांचे वाटप करणे,२८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
—-
कळंब बाजार समितीची आर्थिक उलाढालीत ओळख:
बाजार समिती ही सोयाबीन,राजमा,हरभरा खरेदी मध्ये प्रसिद्ध आहे.त्याचबरोबर अन्य व्यापारीही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे येथील बाजार पेठ ही बाजार समितीमध्ये होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर अवलंबून आहे.मात्र,शेतमालाचे खुले धोरण अस्तित्वात आल्याने बाजार समितीच्या आर्थिक उलाढालिवर विपरीत परिणाम झाला आहे.ग्रामीण भागात शेतमालाची केंद्रे निर्माण झाली आहेत.त्यामुळे बाजार समितीला मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे.